Padmanabhaswamy Temple: सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, केरळच्या पद्मनाभस्वामी मंदिरावर असेल त्रावणकोर राजघराण्याचा अधिकार, तेच करतील संपत्तीची देखभाल
Padmanabhaswamy Temple (संग्रहित संपादित प्रतिमा)

केरळच्या प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिर (Sree Padmanabhaswamy Temple) व तेथील मालमत्तांच्या कारभारासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाने, केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय बदलून देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या व्यवस्थापनाचा अधिकार त्रावणकोरच्या माजी राजघराण्याला (Travancore Royal Family दिला आहे. असे म्हटले जाते की मंदिरात दोन लाख कोटींची संपत्ती आहे. ऐतिहासिक श्री पद्मनाभस्वामी मंदिराचा खजिना व व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारला ट्रस्ट स्थापन करण्यास सांगणारा, केरळ हायकोर्टाचा 31 जानेवारी 2011 चा आदेश सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे.

एएनआय ट्वीट -

यासह, सर्वोच्च न्यायालयाने केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या कारभाराचे त्रावणकोर राजघराण्याचे हक्क अबाधित ठेवले आहेत. या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला. त्यातील एक त्रावणकोर राजघराण्याच्या कायदेशीर प्रतिनिधींनी दाखल केली होती. न्यायाधीश यू.यू. ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे की, अंतरिम पाऊल म्हणून मंदिराचे कामकाज सांभाळणारी प्रशासकीय समितीचे अध्यक्ष तिरुअनंतपुरमचे जिल्हा न्यायाधीश असेल.  या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात 8 वर्षांहून अधिक काळ सुनावणी चालली होती, यावर अद्याप निर्णय झाला नव्हता.

(हेही वाचा: शबरीमाला मंदिराचे दरवाचे महिलांसाठी खुले; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय)

एप्रिलमध्ये या प्रकरणातील सुनावणीनंतर स्टिस ललित आणि न्यायमूर्ती इंदु मल्होत्रा ​​यांच्या खंडपीठाने हा निर्णय राखून ठेवला होता. केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिर हे भगवान विष्णूचे प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारतातील प्रमुख वैष्णव मंदिरांमध्ये समाविष्ट आहे. हे प्राचीन मंदिर 1735 मध्ये त्रावणकोरच्या महाराजा मारताड वर्मा यांनी पुन्हा निर्माण केले होते. हे मंदिर नक्की केव्हा बांधले गेले याचा पुरावा नाही. इतिहासकार डॉ. एलके रवी वर्मा यांच्या मते, हे मंदिर सुमारे 5000 वर्ष जुने आहे, जेव्हा मानवी संस्कृती कलियुगात आली तेव्हा. तसेच, मंदिराच्या रचनेच्या दृष्टीने असे मानले जाते की केरळच्या तिरुवनंतपुरममधील पद्मनाभस्वामी मंदिर सोळाव्या शतकात त्रावणकोरच्या राजांनी स्थापित केले होते.