Cyber Fraud | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

'नमस्कार, मैं अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) बोल रहा हूँ.. कौन बनेगा करोडपती (KBC) से' धीरगंभीर आवाजातील हे वाक्य आपणपैकी बहुतेकांनी ऐकले असेल. पण, थेट 'मी सरन्यायाधीश (Supreme Court) धनंजय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) बोलतो आहे.. जरा 500 रुपये पाठवू शकाल का', असे तुमच्या पैकी कोणी ऐकले आहे काय? जर तुम्हालाही तसा मेसेज आला असेल आणि तुम्ही खूश झाला असाल तर, सावधान!. तुम्ही गंडला गेला आहात. सोशल मीडियावरुन अनेकांना या वाक्याने गंडा घातला असून, तुम्ही त्याच रांगेत आहात असे समजून जा. कारण, न्यायधीशांनी असा कोणालाही फोन अथवा संदेश पाठवला नाही. सामान्य नारिकांकडून पैसे उकळण्यासाठी कोणा अज्ञात सायबर गुन्हेगाराने (Cyber Crime) ही शक्कल लढवली आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा असून पोलीस आणि न्यायालयानेही दखल घेतली आहे.

सरन्यायाधीशांच्या नावे संदेशामुळे खळबळ

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याच नावाने फसवणूक सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर अनेकांना प्राप्त झालेल्या संदेशात म्हटले आहे की, नमस्ते, मी सरन्यायाधीश (CJI) आहे आणि कॉलेजियमच्या महत्त्वाच्या बैठकीस निघालो आहे. पण, मी कनॉट प्लेसमध्ये अडकलो आहे. आपण मला 500 रुपये पाठवू शकता का? याच संदेशात पुढे म्हटले आहे की, कोर्टात पोहोचल्यानंर पुढच्या काहीच वेळात मी पैसे परत पाठवेन. दरम्यान, व्हयारल झालेल्या या पोस्टची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. तसेच, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांच्या निर्देशावरुन सायबर फसवणुकीची तक्रारही देण्यात आली आहे. (हेही वाचा, CJI DY Chandrachud: 'सर्वोच्च न्यायालय 'तारीख पे तारीख' होऊ नये', सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे वकीलांना अवाहन)

सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

फोन, मेसेज यांद्वारे फसवणूक आता सर्वसामान्यांसाठी नवी राहिली नाही. मात्र, आता थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांचे नाव घेऊनच फसवणूक केली जाण्याचा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, सरन्यायाधीशांच्या निर्देशावरुन सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, सोशल मीडियावर अनेकंना न्या. चंद्रचूड यांच्या नावाने संदेश पाठवणारा महाभाग आहे तरी कोण याचा तपास सुरु केला आहे. (हेही वाचा, Save From Dog: कुत्र्यांपासून वाचवा हो! कोल्हापूरच्या जनतेचे CJI DY Chandrachud यांना पत्र)

इंटरनेटच्या माध्यमातून क्रांती झाली आणि डिजिटल मीडियाच्या रुपात माहितीवरची मक्तेदारी मोडीत निघाली. जागतिकीकरणानंर सामान्यांच्या हातात अतिरिक्त पैसा खुळखूळू लागला आणि स्मार्टफोन सहज उपलब्ध झाल्याने अवघे जगच हाताच्या बोटावर आले. परिणामी लोकांचा संवाद वाढला. सहाजिकच माहितीचे आदानप्रदान वाढले. डिजिटल व्यवहारही मोठ्या प्रमाणावर वाढू लागले. त्याचाच फायदा घेऊन सायबर गुन्हेगारही सक्रीय झाले. राज्य आणि देशभरासह जगभरातही सायबर गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढ्या आहेत.