Team India (Photo Credit - Twitter)

भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) चा सुपर-4 सामना पावसामुळे राखीव दिवशी हलवण्यात आला. कोलंबोमध्ये सुरू असलेल्या सामन्यात भारतीय डावाच्या 24.1 षटकांनंतर पाऊस पडला, त्यामुळे मैदान खेळासाठी तयार होऊ शकले नाही. पंचांनी अनेक वेळा मैदानाची पाहणी केली पण रात्री साडेआठ वाजता पुन्हा पाऊस पडल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 सप्टेंबरला सामना घेण्याचा निर्णय घेतला. सामना थांबला तेव्हा टीम इंडियाची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 147 धावा होती. विराट कोहली आणि केएल राहुल नाबाद राहिले. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने सलामी करताना अर्धशतके झळकावली. आता जाणून घ्या राखीव दिवशी कसा खेळ होईल.

जाणून घ्या राखीव दिवशी कसा होणार सामना काय आहे नियम?

11 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये पूर्ण 50 षटकांचा सामना आयोजित करण्याची योजना आहे. याअंतर्गत दुपारी 3 वाजल्यापासूनच खेळ सुरू होईल. भारतीय डाव 24.1 षटकांपासून सुरू होईल आणि कोहली आणि राहुल फलंदाजीसाठी मैदानात उतरतील. बाद झालेले फलंदाज पुन्हा फलंदाजीला येऊ शकणार नाहीत. तसेच पाकिस्तानी गोलंदाजही त्यांची उरलेली षटके पूर्ण करतील. भारतीय डाव पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तान फलंदाजी करेल आणि लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरेल. पुन्हा पाऊस पडणार नाही आणि षटके खराब होणार नाहीत अशा स्थितीत डकवर्थ-लुईस प्रणाली लागू केली जाणार नाही आणि खेळ नेहमीप्रमाणे पुढे जाईल. राखीव दिवशी पुन्हा नाणेफेक होणार नाही. (हे देखील वाचा: India vs Pakistan सामन्यात दिसला नवीन जुगाड, मैदान कोरडे करण्यासाठी गाडीवर लावले पंखे; पहा व्हिडिओ)

भारतीय संघाची फलंदाजी कशी झाली?

तत्पूर्वी 10 सप्टेंबर रोजी बाबर आझमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या फलंदाजीसमोर हा निर्णय चुकीचा ठरला. भारतीय सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी 16.4 षटकांत 121 धावा जोडल्या. दोघांनी अर्धशतके झळकावली. रोहितने 56 धावांची तर शुभमनने 58 धावांची खेळी खेळली. या दोघांनी शाहीन आफ्रिदीला जोरदार धुतले. रोहितने पहिल्याच षटकात षटकार तर गिलने शाहीच्या दोन षटकात प्रत्येकी तीन चौकार मारले. नसीम शाहने सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट घेण्याची नक्कीच संधी निर्माण केली पण नशिबाने भारताला साथ दिली. शाहीनला दुसऱ्या षटकात शुभमनचा झेल पकडता आला नाही. त्यानंतर स्लीपमध्ये शुभमनचा झेल क्षेत्ररक्षकांच्या पुढे गेला. हारिस रौफचा चेंडू रोहितच्या बॅटच्या काठाला लागला पण चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचला.

भारत सलग खेळणार तीन दिवस 

शादाब खानच्या चेंडूंवर मोठे फटके मारत रोहितने वनडेतील 50 वे अर्धशतक पूर्ण केले. यानंतर गिलने पाकिस्तानविरुद्ध प्रथमच अर्धशतक केले. दोघेही ठराविक अंतराने बाद झाले. रोहितला शादाबने तर शुभमनला शाहीनने माघारी पाठवले. 24.1 षटकात 147 धावांवर सामना थांबवण्यात आला तेव्हा विराट कोहली 8 धावा आणि केएल राहुल 17 धावा करत खेळत होता. भारत-पाकिस्तान सामना राखीव दिवशी होणार आहे म्हणजे टीम इंडियाला सलग तीन दिवस खेळावे लागणार आहे. 12 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध सामना आहे.