Tulsi Vivah Mangalashtak in Words: तुळशीचं लग्नं लावताना बिनचूक मंगलाष्टकं गाण्यासाठी इथे पहा त्याचे शब्द!
दांपत्यांच्या जीवनातील सुख, शांती समाधान वाढत राहावे याकरितादेखील तुळशीचं लग्न लावलं जातं. हे लग्न लावणं देखील मंगलाष्टकांशिवाय अपूर्ण आहे.
कार्तिकी एकादशी नंतर सर्वत्र धामधूम असते ती म्हणजे तुळशीच्या लग्नाची (Tulsi Vivah)! यंदा 5 ते 8 नोव्हेंबर पर्यंत तुळशीची लग्न लावली जाणार आहे. हिंदू धर्मियांमध्ये लग्नासारखा पवित्र आणि आनंददायी विधी हा 'मंगलाष्टक' (Mangalashtak) शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे कोणत्याही लग्नाआधी हे शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे आणि वधू-वरांना प्रार्थनेच्या माध्यमातून शुभार्शिर्वाद मिळू दे या कामनेतून मंगलाष्टकं गायली जातात. मग तुळशीचा विवाह देखील त्याला अपवाद नाही. तुळशीच्या लग्नाला देखील इतर लग्नांप्रमाणेच मंगलाष्टकं गाण्याची पद्धत आहे. मग ही मंगलाष्टकं तुम्ही स्वतः गाणार असाल तर पहा त्याच्या आठही कडव्यांचे नेमके शब्द काय आहेत? नक्की वाचा: Tulsi Vivah: तुळशी विवाह करण्याची शास्त्रयुक्त पध्दती; जाणून घ्या पूजाविधी, तुळशी विवाह मुहूर्त आणि सविस्तर माहिती .
तुळशीचं लग्न कार्तिकी एकादशी नंतर तिन्ही सांजेला लावण्याची रीत आहे. त्यामुळे संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळेत म्हणजेच 7 ते 8 दरम्यान हा तुळशीच्या लग्नाचा सोहळा पार पडतो. यावेळेस लग्नादिवशी तुळस विशिष्ट स्वरूपात सजवली जाते. नवरी प्रमाणे बाशिंग, हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र, हळद- कुंकू अर्पण केले जाते. मग सुरू होतात ती मंगलाष्टकं
तुळशीच्या लग्नासाठी मंगलाष्टकं
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।
बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं ||
लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् |
ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मङ्गलं || १ ||
गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।
क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी ।
पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।। २ ।।
लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।
गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।।
अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।।
राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी ।
ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।।
आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।
रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।।
लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी ।
रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।।
दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा ।
धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।
लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।।
सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।
गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।।
विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी ।
सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।।
रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता ।
तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।। ७।।
आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।
गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।।
दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी ।
वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।। ८ ।।
तदेव लग्नं सुदिनं तदेव
ताराबलं चन्द्रबलं तदेव
विद्याबलं दाोवबलं तदेव
लक्ष्मीपते ते त्रियुगं स्मरामि
सुमुहूर्त शुभमंगल सावधानsss
तुलसी विवाहाच्या निमित्ताने घरात गोडा-धोडाचे पदार्थ बनवले जातात. लग्न लागल्यानंतर गोड वाटले जाते तर फटाके फोडून हा आनंंद सोहळा साजरा केला जातो. दांपत्यांच्या जीवनातील सुख, शांती समाधान वाढत राहावे याकरितादेखील तुळशीचं लग्न लावलं जातं.
(The above story first appeared on LatestLY on Nov 04, 2022 04:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

