2019 मध्ये महाराष्ट्राचा पंतप्रधान ? राहुल गांधी नांदेड मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात? 5 मुद्दे
Rahul Gandhi and Ashok Chavan (file photo)

Lok Sabha Elections 2019: कांग्रेस अध्यक्ष (Congress President) राहुल गांधी 2019 ची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातून त्यातही नांदेड लोकसभा मतदारसंघातून (Nanded Lok Sabha Constituency) लढवण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनीही तसे वृत्त दिले आहे. देशातील राजकीय वातावरण आणि त्यातही उत्तर प्रदेश राज्यात बदललेली राजकीय समिकरणे पाहता ही शक्यता नाकारता येत नाही. कारण, काँग्रेसचा पारंपरीक आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा हक्काचा अमेटी मतदारसंघ उत्तर प्रदेशमध्येच येतो. 2004 पासून 2014 पर्यंत अमेटीच्या जनतेने राहुल गांधी यांना साथ दिली. मात्र, 2019 मध्ये ही समिकरणे पहिल्यासारखी राहिली नाहीत. याच पार्श्वभूमिवर राहुल गांधी 2019 ची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातून लढण्याची प्रमुख कारणे काय? यावर टाकलेला हा कटाक्ष.

उत्तर प्रदेशातील अमेटी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला. गेली अनेक वर्षे हा किल्ला मजबूत असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे येथून लोकभा निवडणुक लढवतात. मात्र, उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आणि मायावती यांचा बहुजन समाजवादी पक्ष यांची आघाडी झाल्याने काँग्रेसच्या बालेकिल्ल्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळेच राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दोन सुरक्षित लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे समजते. त्यासाठी एक अमेटी तर दुसरा महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवड करण्यात आल्याचे वृत्त आहे. राहुल गांधी यांच्यासाठी नांदेड हा मतदारसंघ महत्त्वाचा आहे. कारण नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. तसेच, या मतदारसंघातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे सध्या लोकसभेवर प्रतिनिधित्व करत आहेत. अशोक चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

2014 मध्ये काँग्रेसचे महाराष्ट्रातून दोनच उमेदवार निवडून आले. त्यात हिंगोलीतून राजीव सातव आणि नांदेडमधून अशोक चव्हाण. त्यामुळे नांदेड हा मतदारसंघ अधिक सुरक्षीत आहे. त्यातही आजवर नांदेड हा काँग्रेस पक्षासाठी सुरुवातीपासूनच अत्यंत सुरक्षीत मतदारसंघ आहे. प्राप्त माहितीनुसार सोळा पैकी आकरा वेळा या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार निवडणून आला आहे. अगदी सालाबादप्रमाणे आकडेवारीनुसार पाहायचे तर खालील तक्त्यावर नजर टाकल्यावर बरेच चित्र स्पष्ट होते. (हेही वाचा, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चित आणि प्रभावी महिला)

लोकसभा खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा      १९५२-५७ -- --
दुसरी लोकसभा १९५७-६२ हरीहरराव सोनुले      अनुसूचित जाति महासंघ
तिसरी लोकसभा      १९६२-६७ तुलसीदास जाधव      काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ व्यंकटराव तरोडेकर      काँग्रेस
पाचवी लोकसभा      १९७१-७७ व्यंकटराव तरोडेकर      काँग्रेस
सहावी लोकसभा      १९७७-८० केशव शंकर धोंडगे      अपक्ष
सातवी लोकसभा      १९८०-८४ शंकरराव चव्हाण      काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा      १९८४-८९ शंकरराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ व्यंकटेश काबदे       जनता दल
दहावी लोकसभा १९९१-९६ सुर्यकांता पाटील      भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ गंगाधर कुंटुरकर      भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा      १९९८-९९ भास्करराव पाटील (खतगावकर) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ भास्करराव पाटील (खतगावकर)   भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा     २००४-२००९ दिगंबर पाटील भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा     २००९-२०१४ भास्करराव पाटील (खतगावकर)   भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा     २०१४- अशोक चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

दरम्यान, राहुल गांधी महाराष्ट्रातून निवडणुक लढणार काय? या प्रश्नाचे उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, राहुल गांधी हे पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे ते देशातील कोणत्याही मतदासंघातून निवडणूक लढवू शकतात. त्यातही ते जर नांदेड लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असतील तर, त्यांचे स्वागतच आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. दरम्यान, 2019मध्ये काँग्रेसची बहुमताने सत्ता आल्यास राहुल गांधी यांची पंतप्रदानपदी निवड होऊ शकते. त्यामुळे राहुल गांधी नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले आणि काँग्रेसची सत्ता आली तसेच, ते पंतप्रधान झाले तर, पंतप्रधान पदाचा उमेदवार निवडून दिल्याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल. तसेच, महाराष्ट्राचा पंतप्रधान झाल्याचेही पाहायला मिळेल.

दरम्यान, अमेटी हा राहुल गांधी यांचा पारंपरीत मतदारसंघ आहे. याच मतदारसंघातून राहुल गांधी यांनी राजकारण प्रवेशाची घोषणा करत 2004मध्ये लोकसभेत प्रवेश केला होता. त्यानंतर 2009, 2014 असे सलग तीन वेळा ते या मतदारसंघातून निवडूण आले आहेत. 2014 मध्ये अमेटी मतदारसंघातून भाजपने राहुल यांच्या विरोधात स्मृती ईराणी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्या राहुल गांधी यांना पराभूत करु शकल्या नाहीत. 2019मध्येही ते याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मात्र, सपा-बसपा यांची युती झाल्याने आयत्या वेळी काही धोका नको असा सावध पवित्रा काँग्रेस धुरीणांचा आहे. अर्थात अमेटीतून सपा-बसपा आगाडी राहुल गांधी यांच्याविरोधात उमेदवार देणार नाही, असे म्हटले आहे. परंतू, राजकारणात काहीही होऊ शकते याची कल्पना काँग्रेसवाल्यांना चांगलीच आहे. त्यामुळे राहुल गांधी महाराष्ट्रातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.