राजधानी दिल्ली प्रदुषण (संग्रहित, संपादित, प्रतिकात्मक प्रतिमा)

घर, गाडी, बंगला हे प्रत्येकाचे स्वप्न. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी लोकप्रिय असलेले दोनच मार्ग. एक नोकरी, दुसरा व्यवसाय. पैकी, दुसरा पर्यांय सर्वांनाच शक्य होत नाही. त्यामुळे बहुतांश लोक पहिल्या पर्यायाला प्राधन्य देतात. आता नोकरी म्हटलं की, पगार आला. आणि पगार म्हटलं की, तो वाढावा ही प्रत्येकाचीची इच्छा. पण, भारतातील एका शापीत शहराची व्यथा अशी की, इथे गलेलठ्ठ पगार दिला तरी, लोक नोकरी नाकारु लागले आहेत. याची सुरुवात कॉर्पोरेट क्षेत्रातून झाली आहे. होय, हे शापीत शहर आहे. राजधानी दिल्ली. गेली अनेक वर्षे राजधानी दिल्लीचा श्वास गुदमरतो आहे. अलिकडील काळात तर, तो अखेरच्या टप्प्यावर असल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळेच वाढत्या प्रदुषणामुळे भविष्यात ओढावणाऱ्या शारीरीक आजारांपासून सुटका मिळावी म्हणून अनेक लोक दिल्लीची नोकरी? नको रे बाबा!, असे म्हणून लागले आहेत.

प्रदीर्घ काळापासून राजधानी दिल्लीत वायुप्रदुषणाची भायनक समस्या निर्माण झाली आहे. या प्रदुषणामुळे दिल्लीचे जनजीवनच धोक्यात आले आहे. विषारी धूर, धुके आणि धुरके अशा विचित्र मिश्रनात राजधानी दिल्लीचे हृदय अडकले आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीतून लवकरात लवकर कसे बाहेर पडता येईल असा विचार गलेलठ्ठ पगारावर काम करणारी मंडळी करत आहेत. त्यातच, बाहेरुन दिल्लीमध्ये नोकरीला जाणाऱ्यांचेही प्रमाण बरेच घटत आहे. कॉर्पोरेट्स क्षेत्रातील बडे एग्जिक्युटिव (CXO) दिल्ली-एनसीआरमधील जॉब नाकारु लागले आहेत.

कॉर्पोरेट्स कंपन्यातील अनेक बड्या अधिकाऱ्यांना आरोग्याच्या कारणास्तव राजधानी दिल्लीतला चांगल्या पगाराची नोकरी सोडायची आहे. ही मंडळी आता पैशापेक्षा आरोग्यच बरे असे म्हणत दिल्लीला 'गुड बाय' म्हणण्याच्या विचारात आहेत. दरम्यान, यातील ज्या मंडळींना दिल्ली सोडून भारतातच इतर ठिकाणी राहायचे आहे अशी मंडळी, मुंबई, पुणे, बंगळुरु अशा शहरांचा विचार करु पाहातायत.

पर्यावरणाचे अभ्यासक सांगताहेत की, राजधानी दिल्लीतील प्रदुषणाला आळा घालण्यासाठी आताच काही पाऊल उचलले नाही तर, भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागेल. जी कशानेच भरुन काढता येणे शक्य नाही. काही अभ्यासू संस्थांनी केलेल्या सर्व्हेमध्ये तब्बल ४० टक्के CXOsनी राजधानी दिल्लीतील जॉब सोडले आहेत. नवभारत टाईन्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ट्रान्सर्चला दिल्लीस्थीत पेट्रोकेमिकल फर्मसाटी चीफ इन्फर्मेशन/डिजिटल ऑफिसर हवा आहे. बहुतांश अधिकारी हे भारताबाहेरील आहेत. पण, नव्याने नियुक्तीसाठी तसा व्यक्ती मिळणे कठीण होत आहे. राजधानी दिल्लीत निवासासाठी तयार असणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या अगदीच कमी आहे. आर्थात, राजधानी दिल्लीतील प्रदुषणासोबतच महिलासुरक्षेबाबत नसलेली खात्री हेही त्यामागे एक कारण आहे. (हेही वाचा, भारतात केवळ वायू प्रदुषणामुळे तब्बल १ लाख बालकांचा मृत्यू; जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक अहवाल)

धक्कादायक तर असे की, एका संशोधक कंपनीने बंगळुरु येथील टेक कंपनीतील एका एग्जिक्युटिवला दिल्लीतील नोकरीसाठी ऑफर दिली. त्याला चक्क आहे त्या पगाराच्या ८० टक्के इतकी घसघशीत पगारवाढ देऊ केली. पण, तरीही या अधिकाऱ्याने दिल्लीला यायला नकार दिला. मुंबईस्थित एका ग्राहक कंपनीच्या ग्रुप फायनान्स हेड, चेन्नईस्थित इंजिनअरिंग कंपनीचा ऑपरेशन हेड, बंगळुरु स्थित ऑटो कंपनीतील एका कॉलिटी कंट्रोल विभागाच्या हेडनेही राजधानी दल्लीतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी नाकरल्याचे 'नवभारत टाईम्स'ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.