Eco Friendly Diwali 2019: आकाश कंदील, फटाके, दिवाळी खरेदी, दिव्यांच्या उत्साह, लक्ष्मी पूजन, भाऊबीज यांसोबत साजरी करा इकोफ्रेंडली दिवाळी
Eco Friendly Diwali | (Photo credit: Archived, edited, representative images)

Eco Friendly Diwali Celebration 2019:  गणेशोत्सव (Ganeshotsav) संपला की दसरा (Dussehra) येतो. दसऱ्याचा उत्साह संपतो न संपतो तोच वेध लागतात ते दिवाळी सणाचे. दिवाळी (Diwali) म्हणजे संपूर्ण भारतासह जगभरात साजरा केला जाणारा एक दिव्यांचा उत्सव. दिवाळी (Diwali 2019) सणास दीपावली (Deepavali) असेही म्हणतात. कधी काळी अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणारा हा उत्सव आज व्यवसाय आणि बाजारपेठांचे प्रमुख साधन बनला. त्यामुळे परंपरा त्याच असल्या तरी त्या साजऱ्या करताना त्यात नाविन्याच्या नावाखाली विविध वस्तूंचा वापर सुरु झाला. ज्यामुळे प्रदुषणाला निमंत्रण मिळाले. आज आनंदाची आणि उत्साहाची दिवाळी विविध कार्यक्रम, परंपरा यांऐवजी ध्वनी प्रदुषण, जलप्रदुषण, वायुप्रदुषण अशा विविध कारणांनी चर्चेत राहते. आज केवळ भारतच नव्हे तर अवघ्या जगासमोर पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच सावध भूमिका घेत भारत सरकारनेही प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेत पर्यावरण रक्षणाचा निर्धार केला. आपणही सरकारच्या निर्धाराचा धागा होऊया पर्यावरण संवर्धन करण्यासाठी इको फ्रेंडली दिवाळी (Eco Friendly Diwali 2019) साजरी करुया. जाणून घ्या कशी साजरी करताय येऊ शकते यंदाची दिवाळी इको फ्रेंडली (Eco Friendly Deepavali 2019) .

सुती कपडे वापरा

दिवळी आणि कपडे यांचे फार जुने नाते आहे. दिवाळी फराळ आणि दिवाळी कपडे खरेदी हे दोन क्षण भारतीयांसाठी अवर्ननिय. अलिकडील काही वर्षांमध्ये लोकांची आर्थिक स्थिती सुधारल्याने दिवाळी खरेदीत, टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप, महागडी घड्याळं, फर्निचर, बाईक, कार आदी गोष्टींच्या खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. परंतू, दिवाळी खरेदीत कपड्यांचा मान सर्वोच्च. त्यामुळे या वेळी तुम्ही दिवाळी कपडे खरेदी करत असाल तर सुती कपड्यांना प्राधान्य द्या. हे कपडे खरेदी करत असताना प्लॅस्टिक पिशवीचा आग्रह टाळा. खरेदी केलेली कपडे घरी आणताना कागदी पिशवीचा वापर करा. सुती कपडे वापरण्याचा शरीराला फायदा तर असतोच परंतू ते पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बनवलेली असल्याने वापरून झाल्यावर त्याचे विघटनही होते. सुती कपड्यांपासून निसर्गाला धोका नसतो. विशेष म्हणजे दिवाळीत फटाके उडवताना, दिवे लावताना जरी काही अनुचीत प्रकार घडला तरी सुती कपडे शरीराला चिटकत नाहीत. त्यामुळे एक प्रकारची सुरक्षितता मिळते. इतर कपडे ही उष्णतेच्या सानिध्यात वितळत असल्यामुळे ती शरीराला चिकटतात आणि दुर्घटना घडते. त्यामुळे Eco Friendly Diwali दिवाळी साजरी करत सुती कपडेच वापरा.

फटाके फोडताना काळजी घ्या

खरे तर दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे. त्यामुळे फटाके वाजवूच नये. परंतू, जर ते वाजवणार असाल तर वेळ आणि जागेची काळजी घ्या. रहदारी, गर्दी, ज्वलनशील पदार्थ ,वस्तू, केंद्र असलेल्या ठिकाणी फटाके फोडू नका. तसेच, रुग्णालयं, शाळा, हौसिंग सोसायट्या, पाळणाघरं, सरकारी कार्यालयं, धार्मिक ठिकाणं अशा ठिकाणी फटाके फोडू नका. अती तीव्रतेचे, अधिक धूर निघणारे फटाके फोडू नका. ज्यामुळे वायूप्रदुषणात वाढ होईल. शक्यतो कमीत कमी फटाके फोडा. आणि हो.. कोणतीही हानी होणार नाही याची शक्य तितकी काळजी घ्या. फटाके फोडून झाल्यावर त्या ठिकाणी जमा झालेले फटाक्याचे कागद, रसायनं एकत्र गोळा करुन त्याची योग्य ती विल्हेवाट लावा. (हेही वाचा, Diwali 2019 Calendar: धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी ते भाऊबीज पहा यंदा दिवाळी मध्ये कोणता सण कधी?)

नैसर्गिक दिव्यांचा वापर करा

दिवाळीला मातीपासून तयार केलेल्या पणत्या वापरणे ही पूर्वंपार चालत आलेली पद्धत. परंतू, अलिकडी काही काळात विविध धातू किंवा प्लॅस्टिक अथवा भेसळयूक्त मिश्रणातून तयार केलेल्या पणत्याही बाजारात आल्याचे पाहायला मिळते. अशा पणत्यांमधून दिवे लावणे कटाक्षाने टाळा. दिवे लावण्यासाठी शुद्ध मातीच्याच पणत्या वापरा. जेणेकरुन कोणतीही दुर्घटना घडणार नाही.

नैसर्गित वस्तूंपासून तयार केलेल आकाश कंदील वापरा

आज बाजारात विविध पद्धतीचे आकाश कंदील उपलब्ध आहेत. यात पारंपरीक कागद आणि बांबूच्या कामठ्यांपासून बनवलेल्या कंदिलांपासून प्लॅस्टिक आणि थर्माकॉलचा वापर केलेले कंदील पाहायला मिळतात. पण, आपण कटाक्षाने साधा कागद आणि नैसर्गिक पद्धतीने बनवलेले कंदीलच खरेदी करण्यास प्राधान्य द्या. प्लॅस्टिक, थर्माकॉल आदिंचा वापर केलेले कंदील वापरु नका. असे केल्यानेही आपली दिवाळी Eco Friendly पद्धतीने साजरी होईल.

प्लॅस्टिक पिशवीचा आग्रह टाळा

दिवाळी सणांमध्ये खास करुन खरेदी आणि फराळाचे पदार्थ देवाणघेवाण करताना लोक प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करतात. परंतू, हा आग्रह कटाक्षाने टाळा. दिवाळी फराळ देताना तो कागदी किंवा कापडी पिशवीतच द्या. दुकानातूनही मिठाई, कपडे अथवा इतर वस्तुंची खरेदी करताना कापडी अथवा कागदी पिशवीचाच आग्रह धरा. प्रत्येकवेळी खरेदी करताना प्लॅस्टिक पिशवी वापरल्याने घरामध्ये प्लॅस्टिक अनावश्यक पद्धतीने वाढते. या पिशव्या पुढे कचऱ्यातच जातात. त्यामुळे पर्यावरणाला मोठी हानी पोहोचते.

दिवळी साजरी करताना आकाश कंदील, फटाके, पणत्या मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जातात. तसेच, दिवाळीची खरेदी म्हणून कपडे, फर्निचर, महागड्या वस्तूही मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जातात. यात प्लास्टिक आणि पर्यावरणाची हानी करणाऱ्या वस्तूंचा समावेश प्रामुख्याने आढळतो. जसे की, वस्तू खरेदी करताना कापडी पिशवी ऐवजी प्लॅस्टिक पिशवी वापरली जाते. केवळ दिवाळी सणापुरते वापरण्यासाठी वापरा आणि फेकून द्या (युज अॅण्ड थ्रो)  हे तत्व आजमावतात. लक्ष्मी पूजन, भाऊबीज आदि प्रसंगातही हे प्रकार घडताना दिसतात. तेव्हा पर्यावरण रक्षणासाठी इको फ्रेण्डली दिवाळी साजरी करणे केव्हाही चांगले.