Coronavirus Lockdown: कोरोना व्हायरस संकटामुळे भारतात 11.4 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या; देशातील बेरोजगारीचा दर 27.11 टक्क्यांवर- CMIE
बेरोजगारी | प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

एकीकडे संपूर्ण देश कोरोना व्हायरसशी (Coronavirus) लढा देत आहे, तर दुसरीकडे लोकांना त्यांच्या भविष्याची चिंता लागलेली आहे. कोरोना व्हायरस संकटामुळे भारतामध्ये बेरोजगारी (Unemployment) म्हणजेच नोकरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे देशातील बेरोजगारीचा दर 3 मे रोजीच्या आठवड्यात वाढून 27.11 टक्क्यांवर गेला आहे. मार्चच्या मध्यात हा आजार जेव्हा वाढत होता, तेव्हा बेरोजगारी दर सात टक्क्यांपेक्षा कमी होता. मुंबईस्थित थिंक टँकने म्हटले आहे की, बेरोजगारीचे प्रमाण शहरी भागात सर्वाधिक 29.22 टक्के आहे. कोविड-19 संसर्ग झालेल्या रेड झोन भागात सर्वाधिक बेरोजगारी आहे.

ग्रामीण भागातील बेरोजगारीचे प्रमाण 26.69 टक्के आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउन लागू केले तेव्हाच बेरोजगारीचा इशारा दिला होता. या बंदमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आणि दिल्ली व मुंबईसारख्या शहरी भागातून मोठ्या संख्येने स्थलांतरित मजुरांनी पलायन केले.

सरकारने या संकटाला तोंड देण्यासाठी आतापर्यंत 1.70 लाख कोटी रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन जाहीर केले असून, त्यातील एक मोठा भाग म्हणजे आर्थिक दुर्बल घटकांना उत्पन्न आणि अन्न सहाय्य देणे हा आहे. सीएमआयईच्या साप्ताहिक मालिकेच्या आकडेवारीनुसार, कोविड-19 साथीच्या रोगाची लागण झाल्यापासून बेरोजगारीमध्ये सातत्याने वाढ होत आहे आणि 29 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात तो 23.81 टक्के होता. सीएमआयईच्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये मासिक बेरोजगारीचा दर 23.52 टक्के होता. (हेही वाचा: Coronavirus Crisis: जगभरातील 1.6 अब्ज कामगार बेरोजगार होण्याच्या मार्गावर; कोट्यवधी व्यवसाय होऊ शकतात बंद, ILO ने व्यक्त केली भीती)

आकडेवारीनुसार, एप्रिलच्या अखेरीस पुडुचेरी येथे सर्वाधिक, 75.8 टक्के बेरोजगारी निदर्शनास आली आहे. त्यानंतर तामिळनाडू राज्यात 49.8 टक्के, झारखंडमध्ये 47.1 टक्के आणि बिहारमध्ये 46.6 टक्के इतकी बेरोजगारी आहे. सीएमआयईच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील बेरोजगारीचे प्रमाण 20.9 टक्के होते, तर हरियाणामध्ये 43.2 टक्के, उत्तर प्रदेशात 21.5 टक्के आणि कर्नाटकमध्ये 29.8 टक्के होते. सीएमआयईच्या म्हणण्यानुसार, डोंगराळ राज्यांमधील बेरोजगारीचे प्रमाण खूपच कमी आहे. हिमाचल प्रदेशात हा दर 2.2 टक्के, सिक्कीममध्ये 2.3 टक्के आणि उत्तराखंडमध्ये 6.5 टक्के होता.

वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मुंबईत ठाणे परिसरात मजुरांची लांबच लांब रांग; केल नियमांच उल्लंघन - Watch Video 

लहान, मध्यम आणि सूक्ष्म उद्योग, हॉटेल आणि रेस्टॉरंट्स, मल्टिप्लेक्स, रिटेल, एअरलाइन्स, मॅन्युफॅक्चरिंग आणि मीडिया या सर्वांना लॉक डाऊनचा सर्वाधिक फटका बसला आहे. अशात या आणीबाणीचा सामना करण्यासाठी कंपन्यांनी त्यांच्या अनेक कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. सध्या 11.4 कोटी लोक  बेरोजगार झाले आहे व अशाप्रकारे 4 पैकी 1 व्यक्ती बेरोजगार असल्याचे दिसुन येत आहे.