Air India | X

मुंबई ही स्वप्नांची नगरी असली तरीही आज बेरोजगारीचं भयाण वास्तव समोर आलं आहे. Air India Airport Services Ltd मध्ये अवघ्या 600 जागांसाठी 25 हजार उमेदवार आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. आज वॉक इन इंटरव्ह्यू साठी आलेल्यांची संख्या बघून चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली होती. Maintenance Staff साठी आज मुलाखती होणार होत्या. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे, अर्जदारांना केवळ त्यांचे बायोडेटा सबमिट करण्यास आणि नंतर परिसर सोडण्यास सांगण्यात आले. लोडर म्हणून कामासाठी अनेक उच्चशिक्षित उमेदवार आले होते. विमानतळावर एअरपोर्ट लोडर्सकडे विमानात सामान लोड करणे आणि उतरवणे आणि बॅगेज बेल्ट आणि रॅम्प ट्रॅक्टर चालवणे हे काम असते. नोकरी शोधणाऱ्यांना अन्नपाण्याशिवाय तासन तास  थांबावे लागले, त्यामुळे अनेकांना अस्वस्थ वाटत होते.

सोशल मीडीया मध्ये कलिनात या मुलाखतीच्या ठिकाणी जमलेल्या गर्दीचे व्हिडिओ वायरल होत आहेत. या गर्दीमुळे वाहतूक कोंडी देखील झाली होती. दरम्यान या घटनेनंतर वर्षा गायकवाड, आदित्य ठाकरे यांनी देखील X वर पोस्ट करत भाजपा सरकार वर टीका केली आहे.

मुंबई मध्ये मुलाखतीच्या वेळेस चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जदार विमानतळ लोडर्ससाठी 2,216 रिक्त पदांवर त्यांचे नशीब आजमावण्यासाठी आले होते. प्रचंड झालेली गर्दी सांभाळण्यासाठी एअरलाइन्सचे कर्मचारी प्रयत्न करत होते पण त्यांना ते जमलेच नाही. जमावाचे व्हिडिओ सोशल मीडियावर  वायरल होत आहेत  ज्यात अर्जदार फॉर्म काउंटरवर पोहोचण्यासाठी एकमेकांशी धक्काबुक्की करताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी गुजरातच्या भरूच जिल्ह्यात अशीच एक घटना घडली होती. एका खाजगी कंपनीने फक्त 10 पदांसाठी घेतलेल्या मुलाखतीसाठी सुमारे 1800 नोकरी इच्छुकांनी अर्ज केल्याचं समोर आलं होतं.