IND v AUS ODI 2020: वनडे मालिका गमावली पण टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'या' 5 गोष्टी ठरल्या फायदेमंद
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 3rd वनडे (Photo Credit: PTI)

IND v AUS ODI 2020: ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाची (Indian Team) सुरुवात काही चांगली झाली नाही. दोन्ही संघात झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान संघाने 2-1ने शानदार विजय नोंदवला. कॅनबेराच्या (Canberra) मनुका ओव्हल (Manuka Oval) येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) अष्टपैलू कामगिरी करत क्लीन स्वीप टाळला आणि यजमान ऑस्ट्रेलियन फलंदाजांविरुद्ध वर्चस्व गाजवत विजय मिळवला. भारताने पहिले फलंदाजी करून 302 धावांपर्यंत मजल मारली आणि प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया देखील सहज विजय मिळवेल असे दिसत होते, मात्र भारतीय गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट घेत ऑस्ट्रेलियाला अडचणीत पडले. अखेरीस संपूर्ण संघ 289 धावांवर ऑलआऊट झाला. दरम्यान, वनडे मालिका मनोरंजक ठरली आणि आता आगामी टी-20 मालिकेवर सर्वांचे लक्ष लागून असेल. परंतु, एकूणच, भारतीय संघासाठी या मालिकेत काही चांगल्या गोष्टी घडल्या ज्याचा ते पुढे जाऊन फायदा घेऊ शकतात. (IND vs AUS 3rd ODI: विराट कोहलीची 11 वर्षांची शतकी मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध संपुष्टात, 2020 मध्ये टीम इंडिया कर्णधार वनडे सेन्चुरी करण्यात अपयशी)

1. गोलंदाज लयीत परतलेभारतीय गोलंदाजांकडून यंदाच्या मालिकेत मिश्र कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्या दोन्ही सामन्यात गोलंदाजांनी 300 हुन अधिक धावा लुटवल्या. युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह यासारख्या मुख्य गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. चहलला आपल्या खराब खेळीचा फटका बसला आणि तिसऱ्या सामन्यातून बाहेर बसावे लागले, पण बुमराहने मिळालेल्या संधीचा फायदा घेतला. तिसऱ्या सामन्यात बुमराहने दोन गडी बाद केले. ग्लेन मॅक्सवेल एकहाती ऑस्ट्रेलियाला विजयीरेषा ओलांडून देईल असे दिसत असताना बुमराहने त्याला त्रिफळाचित बाद करून संघाला मोठी विकेट मिळवून दिली. शिवाय, शार्दूल ठाकूर, टी नटराजन यांसारख्या गोलंदाजांनी संघासाठी महत्वाच्या विकेट्स घेतल्या. अशा स्थितीत गोलंदाजांचे लयीत परतणे भारतासाठी टी-20 मालिकेपूर्वी फायद्याचे ठरले म्हटलेले योग्य असेल.

2. हार्दिक पांड्या-अष्टपैलू

दुखापतीनंतर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या पांड्याने यंदा बॅटने चांगलीच मालिका गाजवली. हार्दिकने आयपीएलमधील फॉर्म ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कायम ठेवला आणि टीमसाठी जबरदस्त कामगिरी केली. दुसरा सामना वगळता हार्दिकने पहिल्या सामन्यात नाबाद 90 तर अंतिम सामन्यात नाबाद 92 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. शिवाय, दुसऱ्या सामन्यात त्याने तब्बल 14 महिन्यानंतर गोलंदाजीही केली. पांड्याच्या गोलंदाजीमुळे अखेर भारतीय इलेव्हनला बहुचर्चित चर्चेसाठी अतिरिक्त-गोलंदाजीचा पर्याय मिळतो.

3. विराट कोहलीचा फॉर्म

विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या सामन्यात लय मिळवली आणि ती तिसऱ्या सामन्यातही कायम ठेवले. विराटने यंदा दौऱ्यावर सलग दोन अर्धशतक ठोकले, पण त्याचे शतकात रूपांतर करण्यात तो अपयशी ठरला. विराटने पहिल्या सामन्यात 21 धावा केल्या, पण आपली कामगिरी सुधारत त्याने दुसऱ्या सामन्यात 89 आणि तिसऱ्या मॅचमध्ये 63 धावांचा डाव खेळला. विराटचा फॉर्म टीमसाठी महत्वाचा आहे, कारण यामुळे त्यांचे मनोबल वाढते आणि दबाव कमी करण्यात मदतही करते.

4. केएल राहुल (मधल्या फळीत)

उपकर्णधारपदी नियुक्त करण्यात आलेल्या केएल राहुलला यंदा मधल्या फळीत फलंदाजीला पाठवण्यात आले. राहुल यंदा मालिकेत फक्त एकच अर्धशतक करता आले असले तरी त्याच्याने मधल्या फळीला स्थिरता मिळाली आहे. राहुलने यंदा मालिकेत अनुक्रमे 12, 76 आणि 5 अशा धावा केल्या. संघाचे आघाडीचे फलंदाज फेल ठरल्यास राहुलने शांत खेळ करत डाव सावरण्यास दुसऱ्या सामन्यात महत्वाची भूमिका बजावली होती.

5. रवींद्र जडेजा (फिनिशर)

एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर संघाला एका 'फिनिशर'ची गरज भासत होती, आणि त्याचा आयपीएल संघातील साथीदार जडेजाने ती पूर्ण केली असल्याचे मागील दोन सामन्यात दिसुन आले. मधल्या फळीत हार्दिक आणि जडेजाची जोडी जमलेली दिसत आहे. तिसऱ्या सामन्यात संघाची धावसंख्या तीनशे पार नेण्यास दोघांनी महत्वाची भूमिका बजावली होती. जडेजाने अखेरच्या क्षणी मोठे फटकेबाजी करत संघाला मजबूत स्थितीत नेले.