Pune: पर्यटकांनो काळजी घ्या! सिंहगड घाट रस्त्यावर भूस्खलनाचा धोका, अनेक ठिकाणी दरड कोसळली
शनिवार-रविवारी साधारण पंधरा ते वीस हजार पर्यटक सिंहगडावर येत असतात. अशात दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्याने अरुंद घाटरस्त्यावर अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अशा परिस्थितीत जर दरड कोसळली तर मोठी जीवितहानी होऊ शकते.
मुसळधार पावसामुळे (Heavy Rains) पुण्यातील (Pune) सिंहगड किल्ल्याच्या (Sinhagad Fort) घाट रस्त्यालगत अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. रात्री दरड कोसळल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र सिंहगड घाट रस्त्यावर भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. सिंहगड घाट रस्त्यावर पावसाळ्यात दरड कोसळण्याची समस्या वारंवार उद्भवते. गेल्या वर्षी दरड कोसळण्याच्या घटनेत एका तरुण ट्रेकरला जीव गमवावा लागला होता. दरड कोसळल्याने घाट रस्ता वाहतुकीसाठी वारंवार बंद होत आहे.
वनविभागाने दरड प्रतिबंधक कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्षभरापूर्वी अंदाजे दीड कोटी रुपयांचा निधी दिला, मात्र अंदाजपत्रकाची मंजुरी अद्याप बाकी आहे. आता पाऊस सुरू झाल्याने भूस्खलनाच्या घटना मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. नुकतेच गडावरील पुणे दरवाजाजवळील कड्यावरून दगड पडले आणि आता घाट रस्त्याचे अनेक भाग कोसळले आहेत. घाट रस्त्यावरील पहिल्या तीक्ष्ण वळणावर, जे सर्वात धोकादायक स्थान ओळखले जाते, दरड कोसळल्याचा अनुभव आला आहे.
यामुळे रस्त्यावर दगडांचा ढीग अडथळा निर्माण करत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौकीवर शुल्क वसुली करण्याशिवाय इतर कोणत्याही कामात वनविभागाचे अधिकारी उदासीन दिसतात. गतवर्षी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घाट रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले. परंतु, या वर्षी त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नसल्याचे दिसून येते. (हेही वाचा: Vegetable Price Hike: मुसळधार पावसामुळे खिशाला कात्री! आलं आणि टोमॅटो सोबत ह्या भाज्या देखील विक्रमी किमतीला)
शनिवार-रविवारी साधारण पंधरा ते वीस हजार पर्यटक सिंहगडावर येत असतात. अशात दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्याने अरुंद घाटरस्त्यावर अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अशा परिस्थितीत जर दरड कोसळली तर मोठी जीवितहानी होऊ शकते. हे धोके असूनही, प्रशासनाने घाट रस्त्यावर वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी किंवा आपत्कालीन मदत यंत्रणा उभारण्यासाठी कोणतीही योजना राबवलेली नाही. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी फक्त इतकेच सांगितले की, त्यांच्या पथकाने तातडीने रस्त्यावरील दगड-चिखल हटवला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 03, 2023 10:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

