आयएमडी कडून उद्या, म्हणजे 28 जुलै 2019 रोजी अत्यंत जोरदार पर्जन्यवृष्टीबद्दल चेतावणी देण्यात आली आहे. या काळात नागरिकांनी समुद्राजवळ राहू नये असेही सांगण्यात आले आहे. कोणत्याही मदतीसाठी महानगरपालिकेने 1916 हा हेल्पलाईन नंबर जारी केला आहे.

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील सावित्री, आंबा, कुडंलिका नदीने पहाटेच धोक्याची पातळी ओलांडली आहे. कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धरणही ओव्हरफ्लो झाल्याने सोलनपाडा गाव रात्रीच स्थलांतरीत करण्यात आले आहे. सध्या सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून, पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

कोकण, पुणे, मुंबईसह परिसरात अजूनही मुसळधार पाऊस चालू आहे. मांडा टिटवाळा पश्चिम भागात वासुंद्री रोडवरील असलेल्या मराठा चाळीतील एक घर कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक दांपत्य जखमी झाले आहे.

तुफान पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे छातीपर्यंत पाणी साचले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

चिपळूण येथील परशुराम घाटात दरड कोसळल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. 

तुफान पावसामुळे भिवंडीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांच्या सुखरुप सुटकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नौदल, हवाई दल, NDRF चे जवान यांच्यासह भारतीय रेल्वे, स्थानिक नागरीक आणि बचाव कार्याच्या संपूर्ण पथकांचे अभिनंदन करत कौतुक केले आहे.

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष ट्रेनची सोय करण्यात आली. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 डब्यांची विशेष ट्रेन कल्याणहून कोल्हापूरसाठी रवाना झाली आहे.

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

Load More

मुंबईसह उपनगरांमध्ये मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आजही पाहायला मिळत आहे. मुंबई सह ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर या ठिकाणीही मुसळधार पाऊस सुरु आहे. याचा परिणाम रेल्वेच्या तिन्हीही सेवांवर झाला असून मध्य रेल्वेची वाहतूक 20 मिनिटे उशिराने सुरु आहे. तर हार्बर रेल्वे15 मिनिटे उशिराने धावत आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूकही 5 मिनिटे उशिराने सुरु आहे. इतकंच नाही तर ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वेही 5-10 मिनिटे उशिराने धावत आहे.

मध्य रेल्वेची बदलापूर ते कर्जत ही लोकलसेवा बंद करण्यात आली आहे. तसंच बदलापूर ते कल्याण ही लोकलसेवाही बंद आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे.

पावसाचा परिणाम केवळ रेल्वे वाहतूकीवर नाही तर विमान उड्डाणांवरही झाला आहे.विमानांची उड्डाणं 30 मिनिटे उशिराने सुरु आहेत. तसंच रस्ते वाहतूकही मंदावली आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी सब वेही बंद करण्यात आला आहे. तर पूर्व द्रुतगती महामार्गावर ट्रॅफीक जॅम झाले आहे. या सगळ्याचा फटका नोकरदार वर्गाला बसणार आहे.