Epidemic in Mumbai: मुंबई शहरात साथीचे आजार बळावले,  मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, कावीळ, स्वाइन फ्लू रुग्णांमध्ये पुन्हा वाढ
Epidemic in Mumbai | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई (Mumbai) शहरात कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमणाचा वेग कमी करण्यासाठी मुंबई महापालिका (BMC) शर्थीचे काम करत आहे. हे काम सुरु असतानाच आता पावसाळ्यातील साथीचे आजार (Epidemic Diseases) मुंबईकरांना हैराण करत आहेत आणि महापालिकेसमोरील आव्हानही वाढवत आहेत. पाठिमागील काही दिवसांपासून मुंबई शहरात मलेरिया म्हणजेच हिवताप (Malaria), लेप्टोस्पायरोसिस (Leptospirosis), डेंग्यू (Dengue), कावीळ (Jaundice), स्वाइन फ्लू (Swine Flu), यांसारख्या आजारांनी मुंबईकर (Mumbaikar) त्रस्त आहेत. काही परिसरांमध्ये रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी झाली आहे. काही ठिकाणी रुग्णांना अतिदक्षता विभागात (ICU Ward) खाटा उपलब्ध होण्यासही मर्यादा पडत असल्याचे पुढे येत आहे.

मुंबईत ऑगस्ट 2021 मध्ये मलेरिया, डेंग्यू रुग्णांची संख्या

मलेरिया-790 रूग्ण

डेंग्यू-132 रूग्ण

जानेवारी 2021ते ऑगस्ट महिन्यात आढळलेली विविध रुग्णसंख्या

मलेरिया रुग्णसंख्या- 3338 रूग्ण

लेप्टोस्पायरोसिस- 133 रूग्ण

डेंग्यू-209 रूग्ण

गॅस्ट्रो -1848 रूग्ण

कावीळ-165 रूग्ण

स्वाइन फ्लू - 45 रूग्ण

मुंबईत पावसाची संततधार दीर्घकाळ कोसळत राहते हा पूर्वानुभव ध्यानात घेऊन मुंबई महापालिका आणि खासगी रुग्णालयंही औषधांचा पुरेसा साठा आगोदरच तयार ठेवण्यावर भर देतात. त्यामुळे ऐन पावसाळ्यात जरी रुग्णांची संख्या वाढली तरी, त्यांना सेवा देणे शक्य होते. मात्र, कधी कधी रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णालया बेडची संख्या कमी पडण्याचे प्रकार घडतात. (हेही वाचा, Epidemic in Mumbai: मुंबई शहरात वाढले साथीचे आजार; डेंग्यू, हिवतापाने मुंबईकर त्रस्त)

दरम्यान, नागरिकांनी पावसाळ्यात सुरुवातीपासूनच आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यासाठी उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, पाणी उकळून, गाळून आणि थंड करुनच प्या. बाहेरचे खाने टाळा. बाहेर जाताना शक्यतो घरचे अन्न सोबत घेऊन जा. कोणताही आजार जसे की, ताप, डोकेदुखी, सर्दी, खोकला, घसादुखी आणि अंगदुखी अंगावर काढू नका. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग्य असा आहार घ्या. पावसात भिजल्यावर लगेच वातानुकुलीत वातावरणात (एसी) जाऊ नका. कपडे केस ओले ठेऊ नका. डॉक्टरांनी दिलेला प्रतिजैविकांचा कोर्स अर्धवट सोडू नका.

डॉक्टर सांगतात की, कोणताच आजार अथवा दुखणे अंगावर काढू नका, असे आरोग्य विभागाकडून नेहमीच सांगितले जाते. मात्र, डोकेदुखी, सर्दी, खोकला, घसादुखी आणि अंगदुखी, किरकोळ ताप अशा कारणांसाठी अनेक नागरिक रुग्णालयात जात नाहीत. डॉक्टरांचा सल्ला घेते नाहीत. असे दुखणे शक्यतो ते अंगावरच काढण्याचा प्रयत्न करतात. काही नागरिक तर जवळच्या मेडिकल स्टअरमध्ये जाऊन औषध विक्रेत्याला होणारा त्रास सांगतात व त्याच्याकडूनच त्याच्या सल्ल्याने औषधे घेतात. असे केल्याने आजार बळावतो. अगदीच सहन झाले नाही तर, अशी मंडळी डॉक्टरांचा सल्ला घेतात. असे केल्यानेच संसर्गजन्य आजारांचा मुक्काम अधिक काळ वाढतो, असे डॉक्टर सांगतात.