देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजप सोपवणार केंद्रात मोठी जबाबदारी? कारणं आणि कंगोरे
Devendra Fadnavis | (Photo Credit: Facebook)

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात किंवा दिल्ली दरबारी मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2020 (Maharashtra Assembly Election 2020 मध्ये तब्बल 105 आमदार निवडून आणूनही विरोधात बसाव्या लागलेल्या भाजपमध्ये पक्षांतर्गत संघर्ष तीव्र झाला आहे. भाजपने विधानसभा निवडणूक शिवसेना या मित्रपक्षासोबत युती करुन लढली असली तरी, पक्ष म्हणून या निवडणुकीची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. दरम्यान, विधानसभा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदावरुन भाजप शिवसेना (Shiv Sena) यांच्यात जोरदार संघर्ष झाला. या संघर्षाचे कारण भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर फुटले असले तरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच या संघर्षाला कारणीभूत असल्याचे महाराष्ट्र भाजपातील एका गटाचा आणि अनेक कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमटणारा पक्षांतर्गत आवाज ध्यानात घेऊन देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय पातळीवर जबाबदारी देऊन राज्यातील भाजपमधील नाराजी दूर करण्याचा पक्षनेतृत्वाचा प्रयत्न असू शकतो असे काही राजकीय निरिक्षकांचे मत आहे.

सर्वात पक्ष असूननही भाजप विरोधातच

देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत जबाबदारी देण्याच्या चर्चेला वेगवेगळे असे अनेक आयाम आहेत. त्यापैकी एक म्हणजे 105 आमदार निवडून आणून आणि राज्यातील क्रमांक एकचा पक्षही ठरुनही भाजपला सत्ता मिळाली नाही. पक्षाला विरोधातच बसावे लागले. याची सल भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मनात आहे. महाराष्ट्रात भाजपची सत्ता केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे येऊ शकली नाही. कारण, मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन... असे म्हणत त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदावरचा दावा कायम ठेवला. तसेच, शिवसेना पक्षास कारण नसताना बिथरवले. मुख्यमंत्री पदाबाबत भाजप नेतृत्वाने पर्यायाने मोठी जबाबदारी असलेल्या फडणवीस यांनी शिवसेने पक्षासोबत कोणतेच लवचिकतेचे धोरण स्वीकारले नाही. त्यामुळे शिवसेनेतील असंतोषात भर पडली आणि महाविकासआघाडी स्थापन झाली, असे अनेकांना वाटते.

Devendra Fadnavis | (Photo Credit: Facebook)

फडणवीस यांनी स्वपक्षीयांचेच दोर कापले

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर असतना त्यांनी विरोधकांना नेस्तनाबूत करताना स्वपक्षातील विरोधकांनाही नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यात प्रामुख्याने ओबीसी नेत्यांचा मोठा समावेश होता. याची परिणीती एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावणकुळे, राज पुरोहीत, विनोद तावडे, यांसारख्या मान्यवर नेत्यांना विधानसभा तिकीट न देण्यात झाली. दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे यांच्यासारख्या ताकदवान नेत्याचा पराभवही झाला. त्यामुळे या सर्व गोष्टींना देवेंद्र फडणवीस यांना भाजपमधील अनेक कार्यकर्ते जबाबदार धरतात. एकनाथ खडसे यांना तर भुखंड घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. नंतर त्यांचे कधीच पुनर्वसन झाले नाही. पुढे फडणवीस मंत्रिमंडळातील अनेकांवर भ्रष्टचाराचे आणि घोटाळ्याचे आरोप झाले परंतू, जवळपास त्या सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्लिन चिट दिली. मात्र, ही क्लिन चिट एकनाथ खडसे यांच्या कधीच वाट्याला आली नाही, याबाबत भाजपमधील अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अनेकदा उखड नाराजी व्यक्त केली आहे. (हेही वाचा, Rajya Sabha Elections 2020: राज्यसभेवर महाराष्ट्रातून कोणाची वर्णी? शरद पवार, रामदास आठवले यांच्यासह उदयनराजे भोसले, किरीट सोमय्या, हंसराज अहीर यांच्यात चूरस)

भाजपमधील नाराज गट आक्रमक

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. त्यामुळे भाजपमध्ये आगोदरच नाराज असलेल्या गटाने अधिकच जोरदार आक्रमक पवित्रा घेतला. पंकजा मुंडे यांनी तर परळी येथे घेतलेल्या एका भव्य मेळाव्यात कोनाचेही नाव न घेताल स्पष्ट नाराजी बोलून दाखवली. विशेष म्हणजे या कार्यक्रमास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे स्वत: उपस्थीत होते. या मेळाव्यात बोलताना 'मी पक्ष सोडणार नाही, पक्षाला मला काढून टाकायचे असेल तर त्यांनी तसा निर्णय घ्यावा', असे थेट आव्हानच पक्षनेतृत्वाला दिले होते. एकनाथ खडसे यांनीही या मेळाव्यास आपण भाजप म्हणून नव्हे तर पंकजा मुंडे यांच्यामुळे आहोत. पंकजा मुंडे पक्षात राहतील आपले काही सांगता येत नाही, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

Bjp Leader | (Photo credit: archived, edited, symbolic images)

मेगाभरतीमुळे भाजपच्या मूळ कार्यकर्त्यावर अन्याय

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना भाजपमध्ये इतर पक्षांतून आयारामांची मोठी भरती केली. या पक्षप्रवेशांना भाजप मेगाभरती असेच नाव पडले. विधानसभा निवडणुकीत या आयारामांना भाजपने तिकीटेही दिली. परंतू, आयारामांमुळे भाजपमधील मूळ कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली गेली. विशेष म्हणजे भाजपने इतर पक्षातून आयात केलेल्या आयारांमांना जनतेनेही जोरदार धक्का दिला. ज्यामुळे आयाराम मंडळीतील बहुतांश लोक पराभूत झाले. निष्टावंतनांना तिकीटे नाकारुन आयारामांवर विश्वास ठेवल्याने भाजपचे मोठे नुकसान झाल्याची भावनाही भाजपतील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी बोलून दाखवली आहे. प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांनीच स्वत: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अन्य पक्षांतील बडय़ा नेत्यांना गळाला लावून संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न भाजपने केला असला तरी या ‘भरतीमुळेच भाजपच्या मूळ संस्कृतीला धक्का लागला’, अशा शब्दात भरतीच्या प्रयोगामुळे पक्षाचे नुकसानच झाल्याची अप्रत्यक्ष कबुलीची दिली होती. अर्थात पुढे त्यांनी आपल्या विधानावर घुमजाव करत सारवासारव केली.

BJP | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

एकनाथ खडसे यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याचे आरोप

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी तर देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर नाव घेऊन थेट टीकास्त्र सोडले होते. तसेच, आपले राजकारणच संपविण्याचा प्रयत्न फडणवीस आणि महाजन करत असल्याचा सणसणीत आरोप करुन खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर भाजप गोटात चांगलीच अस्वस्थता आणि खळबळ माजली होती.

Eknath Khadse | (Photo Credit: Facebook)

त्यामुळे वरील सर्व कंगोऱ्यांचा विचार करता महाराष्ट्र भाजपमध्ये असलेली नाराजी दूर करायची असेल तर नेतृत्व आणि जबाबदारी यांमध्ये मोठ्या प्रमाणावर खांदेपालट करावी लागेल. हा विचार करुनच भाजपच्या नेतृत्वगटाने फडणवीस यांना दिल्लीला पाठवण्याचा विचार सुरु केलेला असू शकतो. दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाच्या तुलनेत विचार करता तरुण आहेत. त्यामुळे कमी वयात राष्ट्रीय पातळीवरचा अनुभव आल्यास भविष्यात भाजपला फायदा होऊ शकतो. दुसरे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ प्रतिमेचाही भाजपला फायदा होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्र भाजपमध्ये काही गटांची नाराजी दूर करणे आणि केंद्रीय पातळीवर तरुण चेहरा पडद्यावर आणणे असा दुहेरी डाव भाजप खेळू शकते.