Vat Purnima 2019: जाणून घ्या वटपौर्णिमा सणाचे महत्व, उद्देश आणि पूजा विधी

सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आई-बाप आणि देवगुरू यांच्या विरोधाला डावलून माळ घातली, व वटपौर्णिमेच्या दिवशी यमाकडून पतीचे प्राण परत आणण्याचे काम चिकाटीने, दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखविले.

Vat Purnima 2019: जाणून घ्या वटपौर्णिमा सणाचे महत्व, उद्देश आणि पूजा विधी
Vat Purnima 2019 (Photo Credit : Youtube)

भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक नात्यासाठी एक सण आहे. त्यात पती पत्नीमधील नाते हे फार महत्वाचे आहे, याच नात्याचे महत्व सांगणारा सण म्हणजे वटपौर्णिमा. सातही जन्म हाच पती मिळूदे तसेच पतीला दीर्घायुष्य लाभूदे म्हणून स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात. यमाला हरवून पतीचे प्राण परत मिळवणार्‍या सावित्रीच्या पातिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते. वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला केले जाते. यावर्षी 16 जून रोजी हा सण साजरा केला जाईल. यानिमित्ताने जाणून घेऊया या सणाचे महत्व -

वड, पिंपळ, औदुंबर आणि शमी हे पवित्र अन् यज्ञवृक्ष म्हणून सांगितले आहेत. या वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य अधिक असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही पुष्कळ होतो म्हणून प्रामुख्याने वडाची पूजा केली जाते. वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीचीच पूजा करण्यासारखे आहे.

सावित्रीने याच वडाच्या झाडाखाली यमाशी भांडून आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत आणले होते. सावित्रीच्या पतीप्रेमाचे प्रतिक म्हणून वडाचे झाड पूजले जाते.

पूजेचे साहित्य -  हिरव्या बांगड्या, शेंदुर, एक गळसरि, अत्तर, कापुर, पंचामृत, पुजेचे वस्त्र, विड्याची पाने, सुपारी, पैसे, गुळ खोबरयाचा नैवेद्य, आंबे, दूर्वा, गहु

असे करा व्रत – यादिवशी स्त्रियांनी उपवास करावा. सौभाग्यवती स्त्रीने यादिवशी ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प करावा. त्यानंतर वडाचे षोडशोपचारे पूजन करावे. पूजेचा अभिषेक झाल्यानंतर वडाला सात वेळा सूत्रवेष्टन करावे. पूजेच्या शेवटी ‘अखंड सौभाग्य लाभू दे, जन्मोजन्मी हाच पती लाभू दे’ अशी सावित्रीसह ब्रह्मदेवाला प्रार्थना करावी. त्यानंतर पाच फळांचे वाण लुटले जाते म्हणजेच 5 सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी. सायंकाळी सुवासिनी सह सवित्रीच्या कथेचे सामुदायिक वाचन करावे.

सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आई-बाप आणि देवगुरू यांच्या विरोधाला डावलून माळ घातली, व वटपौर्णिमेच्या दिवशी यमाकडून पतीचे प्राण परत आणण्याचे काम चिकाटीने, दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखविले.

(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2019 03:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).