Gudi Padwa 2019: हे आहे गुढीपाडव्याचे पौराणिक महत्व; जाणून घ्या या दिवसाशी निगडीत काही कथा
गुढीपाडवा (Photo Credit : Youtube)

चैत्र शु.प्रतिपदा, सर्वत्र हिंदु नववर्षदिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण गुढीपाडवा (Gudi Padwa) या नावाने साजरा होईल. वर्षभरातील साडेतीन शुभ मुहूर्तापैकी हा पुर्ण दिवस एक महत्वाचा मुहूर्त मानला जातो. याच दिवशी वसंत रुतु सुरु होतो. सर्व रुतुत वसंत मीच आहे अस भगवान गीतेत सांगतात. वसंत निसर्गाला नव बहार देतो. वातावरण आरोग्यदायी असते. या दिवशी नव जीवन सुरु करण्याच्या द्रुष्टीने मन सकारात्मक झालेले असते. या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने रज तम गुण एक लक्षांश एवढे कमी होतात व तेवढ्याच प्रमाणात सतोगुण वाढलेले असतात.

या दिवशी कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी. घरावर गुढी उभारून, उदबत्ती, धूप इत्यादीने वातावरण सुवासिक ठेवावे. दिवसभर भजन-कीर्तन व शुभ कार्य करत आनंदाने वेळ घालवावा. सर्व जीव व प्रकृतीसाठी मंगल कामना करावी. ब्राह्मणाची अर्चना करत लोकहितासाठी प्याऊ स्थापित करावे.

तर आता प्रश्न पडला असेल की नक्की गुढीपाडवा साजरा करण्यास कधी सुरुवात झाली? पुराणात गुढीपाडव्यासंदर्भात काही आख्यायिका आढळतात त्या पाहाव्या -

> गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली. त्या दिवसापासून काळाने चालणे सुरू केले. म्हणजे जो काळ आपण आज मोजतो, त्याचा आरंभबिंदू हा होता.

> शालीवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार करून त्यावर पाणी शिंपडले त्यांच्यात प्राणांचा संचार केला व प्रभावी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या विजय प्रित्यर्थ शालीवाहन शक सुरु झाले. ते याच दिवशी

> प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरवात केली तीच देवीच्या, स्त्रीच्या रूपात सुरु केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंंकराचे लग्न पाडव्यादिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्यादिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र म्हणतात.

> या दिवशी प्रभू राम देवी जानकीयानां सोबत घेऊन अयोध्या नगरीत परतले म्हणून विजय पताका लावून त्यांचे स्वागत करण्यात आले होते. (हेही वाचा: पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणारा यंदाचा गुढी पाडवा कधी आणि शुभ मुहर्त याबद्दल अधिक जाणून घ्या)

> या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू पादशाहीचे भगवा विजय ध्वज लावून हिंदू साम्राज्याची नीव ठेवली होती.

खरे तर गुढीपाडवा आनंदाचा, उत्सवाचा प्रतीक असला तरी तो बदलाचेही प्रतीक आहे. शेतकर्‍यांसाठीही तो महत्त्वाचा आहे. आंध्र प्रदेशात 'उगादी' (युगाब्धी) चा प्रारंभ याच दिवशी होतो. सिंधी समाजात भगवान झुलेलाल यांचा जन्मदिवस अर्थात चेट्रीचंड याच दिवशी असतो. सप्तऋषी संवत अनुसार काश्मीरमध्ये नवरेह म्हणून नववर्षाचा प्रारंभ होतो. इतिहासात याच दिवशी सम्राट चंद्रगुप्त, सम्राट विक्रमादित्य यांनी शकांवर विजय प्राप्त केला. म्हणून विक्रम संवत सुरू करण्यात आले.