Rama Ekadashi 2020: रमा एकादशी कधी आहे? जाणून घ्या व्रताचे महत्त्व, पूजाविधी, कथा आणि शुभ मुहूर्त
रमा एकादशी 2020 (File Photo)

Rama Ekadashi 2020: हिंदी पंचांगानुसार कार्तिक मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला रमा एकादशी (Rama Ekadashi) म्हणतात. या दिवशी व्रत ठेवून भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. यावर्षी ही एकादशी 11 नोव्हेंबर म्हणजेच बुधवार आहे. मान्यतेनुसार, हे व्रत केल्याने सर्व पाप नष्ट होतात. तसेच ब्रह्महत्यासारखे महापापही दूर होते. सौभाग्यवती स्त्रियांसाठी हे व्रत सुख आणि सौभाग्यप्रद मानले जाते. रमा एकादशीला भगवान विष्णूसमवेत देवी लक्ष्मीची उपासना केली जाते. आज या लेखातून रमा एकादशीचे व्रत, मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व जाणून घेऊयात...रमा एकादशीचं व्रत वर्षाच्या 24 एकादशीमध्ये विशेष आहे. कारण, या दिवशी भगवान विष्णू आपल्या योगासाधनेतून जागे होतात. पद्म पुराणानुसार या व्रताचे पालन केल्याने माता लक्ष्मी तसेच भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळतो. जी व्यक्ती संपूर्ण नियमांचे पालन करून हे व्रत करते, त्याची सर्व पापे नष्ट होतात. त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही पैशाची आणि धन-संपत्तीची कमतरता भासत नाही. (हेही वाचा - Bhaubeej 2020 Date and Significance: यंदा भाऊबीज कधी? जाणून घ्या बहिण-भावाचे नाते वृद्धिंगत करणाऱ्या सणाचे महत्त्व)

या एकादशीला रमा एकादशी असे नाव का देण्यात आले -

कार्तिक महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. भगवान विष्णू चार महिन्यांनंतर योगसाधनेतून जागे होतात. श्रीहरीच्या योगासनादरम्यान कृष्णा पक्षातील सर्व सण काही प्रमाणात देवी लक्ष्मीशी संबंधित असतात. दीपावलीमध्ये देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. माता लक्ष्मीचे दुसरे नाव रमा असे आहे. त्यामुळे या एकादशीला रमा एकादशी असे म्हणतात.

रमा एकादशीचा मुहूर्त -

एकादशीचा प्रारंभ - सकाळी 03.22 (11 नोव्हेंबर 2020)

एकादशी समाप्ती - रात्री 12.40 (12 नोव्हेंबर 2020)

रमा एकादशी पूजा-विधी -

राम एकादशीचे व्रत दशमीच्या संध्याकाळी सुरू होते. म्हणून दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे. अशाप्रकारे, एकादशीच्या दिवशी पोट पूर्णपणे रिक्त राहते. दुसर्‍या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करावे. तसेच ध्यान करत एकादशीच्या व्रताचा संकल्प करावा. यानंतर, शुभ मुहूर्तावर, भगवान श्रीकृष्ण यांची विधिवत धूप, दीप, फुले, फळे, नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. या दिवशी तुळशीची पूजा करावी.

रमा एकादशी कथा -

पौराणिक कथेनुसार, हजारो वर्षांपूर्वी मुचुकुंद नावाचा एक राजा होता. या राजाचे इंद्र देव, कुबेर, वरूण आणि विभीषण हे सर्व जवळचे मित्र होते. मुचुकुंद राजाला विष्णूप्रती विशेष भक्ती होती. या राजाच्या कन्येचं नाव चंद्रभागा होतं. तिचा विवाह राजा चंद्रसेनचा पुत्र शोभन याच्याशी झाला होता. योगायोगाने शोभन राजकुमार एकादशीच्या तिथीवर आपल्या सासरी आला होता. त्या दिवशी त्याने एकादशीचे व्रत करण्याचा निर्णय घेतला. मात्र चंद्रभागा शोभन कसे उपाशी काय राहतील या चिंतेने व्याकुळ झाली होती. परंतु, राजा मुचुकुंदच्या सक्तीमुळे ती शांत बसली.

भूकेने व्याकूळ झालेल्या शोभन राजकुमाराचा मृत्यू झाला. त्यानंतर विष्णूने त्यांला पुन्हा जीवनदान दिलं. तसेच त्याला मंदराचल पर्वतावरील राज्य दिलं. तेथे तो आपल्या पत्नीसह आनंदाने राहू लागला. तेव्हापासून या एकादशीच्या व्रताला मोठ महत्त्व प्राप्त झालं. वारकरी संप्रदयातील लोक आजही एकादशीचे व्रत नियमाने पाळतात.