Ganpati Visarjan Dates 2021: दीड ते 10 दिवसांच्या गणपतींचं यंदा पहा कधी होणार विसर्जन
Ganesh Visarjan | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

भाद्रपद शुक्ल चतुर्थी ते चतुर्दशी असा दहा दिवस महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा केला जातो. या दहा दिवसांच्या सेलिब्रेशन मध्ये गणेशभक्त बाप्पाचं घराघरांमध्ये किंवा सार्वजनिक मंडपांमध्ये दर्शन घेतात. यंदा देखील बाप्पाचं आगमन 10 सप्टेंबर दिवशी होणार असून त्यानंतर दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवसांनी विसर्जन होणार आहे. दरम्यान प्रत्येक घरामध्ये रीतीभातींनुसार गणेश विसर्जनाचा (Ganesh Visarjan) वेगवेगळा दिवस असतो. पण यंदा तिथींनुसार आणि दिवसांच्या गणितानुसार पहा कधी असेल घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन? (नक्की वाचा: Ganesh Visarjan at Home: गणपती विसर्जन कसे करतात? जाणून घ्या उत्तर पूजा विधी ते व्हर्च्युअल गणेश विसर्जनाचे प्लॅन्स!).

महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणात गणेशोत्सवाची मोठी धूम असते. गणेश मूर्तींचं विसर्जन तलावांमध्ये, पाणवठ्यामध्ये करण्याची पद्धत आहे. यंदा कोरोना संकटामुळे प्रशासनाकडूनच नागरिकांना धातूची मूर्ती किंवा शाडूच्या मातीची मूर्ती घरी आणण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. यामुळे आता कृत्रिम तलावांमध्ये किंवा घराच्या घरी देखील गणेश मूर्ती विसर्जित केल्या जाऊ शकतात.  नक्की वाचा: Ganeshotsav 2021Dates: हरतालिका, ज्येष्ठा गौरी पूजन ते अनंत चतुर्दशी यंदा गणेशोत्सवात पहा महत्त्वाच्या दिवसांच्या तारखा!

गणेश विसर्जन 2021 तारखा

  • दीड दिवस

दीड दिवसाच्या घरगुती गणपतींचं विसर्जन शनिवार 11 सप्टेंबर दिवशी होणार आहे.

  • पाच दिवस

पाच दिवसांच्या गणपतींचं विसर्जन 14 सप्टेंबर दिवशी होणार आहे.

  • गौरी-गणपती विसर्जन

ज्या घरात गौरी आणि गणपती अशा दोघांचंही आगमन होतं त्यांच्या घरात गौरी-गणपती विसर्जन 14 सप्टेंबरला होणार आहे.

  • सात दिवस

काही घरात किंवा सार्वजनिक मंडळांमध्ये सात दिवसांचे गणपती विराजमान होतात. अशा गणपतींचं विसर्जन 16 सप्टेंबर दिवशी होणार आहे.

  • दहा दिवस

अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करण्याची पद्धत आहे. यंदा ती 19 सप्टेंबर दिवशी आहे.

दरम्यान यंदा अनेक पालिका स्तरांवर गणपती विसर्जनाला सार्वजनिक पाणवठ्याच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन स्लॉट बुकिंगची सोय करण्यात आली आहे. यामध्ये कृत्रिम तलावामध्ये गणेशमूर्तींचं विसर्जन करून अनावश्यक गर्दी आणि त्यामधून आगामी तिसर्‍या लाटेचा धोका टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.