Job | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

सध्याच्या राहणीमानाच्या वाढत्या खर्चाच्या दबावामध्ये आणि कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांमध्ये बदल होत असताना, लोकांचा नोकरीच्या बाबतीत प्राधान्यक्रम बदलत असल्याचे दिसून येत आहे. एका अहवालानुसार, 74% कर्मचारी थोडा कमी पगार मिळाला तरी चालेल, मात्र त्या बदल्यात दीर्घकालीन लाभांना प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. स्टाफिंग सोल्यूशन्स आणि एचआर सेवा प्रदात्या जीनियस कन्सल्टंट्सच्या अहवालात ही बाब उघड झाली आहे. याबाबत मुलाखत घेतलेल्या सुमारे 74 टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ते आरोग्य विमा, सेवानिवृत्ती नियोजन आणि शिक्षण समर्थन यासारख्या मजबूत दीर्घकालीन फायद्यांच्या बदल्यात किंचित कमी पगार निवडतील.

जीनियस कन्सल्टंट्सचा हा अहवाल भारतातील विविध क्षेत्रातील 1,139 कर्मचाऱ्यांच्या माहितीवर आधारित आहे. त्यात पुढे असे आढळून आले की, सध्या फक्त 32 टक्के कर्मचाऱ्यांना असे वाटते की, त्यांचे सध्याचे लाभ पॅकेज त्यांच्या आर्थिक कल्याणासाठी प्रभावीपणे मदत करते, तर 61 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांनी त्यांचे फायदे अपुरे असल्याचे म्हटले आहे. अहवालात म्हटले आहे की, मुलाखत घेतलेल्या 54 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांची कंपनी वेलनेस प्रोग्राम राबवताना मानसिक आणि आर्थिक आरोग्याला प्राधान्य देत नाही.

यासह सुमारे 84 टक्के प्रतिसादकर्त्यांनी पुष्टी केली आहे की, हायब्रिड किंवा रिमोट व्यवस्था यासारख्या लवचिक कामाच्या पर्यायांमुळे त्यांना बचत करण्यास आणि त्यांचे आर्थिक व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने करण्यास मदत होईल. अहवालात असेही म्हटले आहे की, उत्पादकता वाढीपलीकडे, कामाच्या ठिकाणी लवचिकता आणि आर्थिक कल्याण यांच्यात एक मजबूत संबंध असल्याचे यातून दिसून येते. सुमारे 73  टक्के कर्मचाऱ्यांनी मान्य केले की, कामगिरीवर आधारित बोनस आणि प्रोत्साहने त्यांच्या सध्याच्या आर्थिक चिंता लक्षणीयरीत्या कमी करतील.

कर्मचार्‍यांच्या प्राधान्यांमध्ये हा बदल अनेक कारणांमुळे झाला आहे. वाढता जीवनावश्यक खर्च आणि महागाई यामुळे कर्मचारी तात्कालिक पगारवाढीपेक्षा दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेला प्राधान्य देत आहेत. उदाहरणार्थ, आरोग्य विमा आणि निवृत्ती नियोजन यामुळे भविष्यातील अनिश्चितता कमी होते. यासह, कोविड-19 नंतर कर्मचार्‍यांच्या काम आणि जीवनाच्या संतुलनाबाबतच्या अपेक्षा बदलल्या आहेत. हायब्रिड आणि दूरस्थ कामाचे पर्याय आता केवळ सुविधा नाहीत, तर आर्थिक आणि मानसिक कल्याणासाठी आवश्यक मानले जात आहेत. (हेही वाचा: Tech Layoffs 2025: टेक क्षेत्रात 2025 मध्ये 61,000 हून अधिक नोकर कपात; Microsoft, IBM, Google, Amazon सह अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढले)

हा अहवाल नियोक्त्यांसाठी एक महत्त्वाचा संदेश आहे की, कर्मचार्‍यांचे आर्थिक आणि मानसिक कल्याण यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवायचे असेल तर, त्यांना दीर्घकालीन लाभ देणे आवश्यक आहे. जिनियस कन्सल्टंट्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आरपी यादव म्हणाले की, संस्थांनी हे ओळखले पाहिजे की शाश्वत, भविष्य-केंद्रित फायदे देणे हे केवळ मानव संसाधन कार्य नाही, तर कर्मचाऱ्यांची निष्ठा, उत्पादकता आणि वाढीमध्ये एक धोरणात्मक गुंतवणूक आहे.