Chhatrapati Shivaji Maharaj Memorial: आग्रा येथे बांधले जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक; मीना बाजारच्या ठिकाणी केली जाणार जमीन संपादित, CM Devendra Fadnavis यांची घोषणा

आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रामसिंगच्या कोठीत ठेवण्यात आले होते, ती सध्याच्या मीनाबाजार भागातील जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार असून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार येईल.

Chhatrapati Shivaji Maharaj Memorial: आग्रा येथे बांधले जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक; मीना बाजारच्या ठिकाणी केली जाणार जमीन संपादित, CM Devendra Fadnavis यांची घोषणा
Devendra Fadnavis (Photo Credits: File Photo)

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि आग्रा (Agra) यांचा संबंध त्यांच्या 1666 मधील आग्रा भेटीशी संबंधित आहे, जिथे त्यांनी औरंगजेबाच्या दरबारात अपमानित झाल्यानंतर धाडसी पलायन केले होते. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी घोषणा केली की, राज्य सरकार आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधेल, जिथे त्यांना बंदिवासात ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री फडणवीस मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त आग्रा येथे एका कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी गेले होते. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलतील आणि महाराष्ट्र सरकार मीना बाजार नावाच्या ठिकाणी स्मारक स्थापन करण्यासाठी जमीन संपादित करेल.

आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रामसिंगच्या कोठीत ठेवण्यात आले होते, ती सध्याच्या मीनाबाजार भागातील जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार असून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार येईल. आग्रा येथे शिवजन्मोत्सव साजरा करण्याचे महत्त्व आणि औचित्य अत्यंत अभिमानास्पद असून हा उपक्रम सर्व शिवप्रेमींना ऊर्जा देणारा असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

ते पुढे म्हणाले, ‘आग्रा येथे महाराजांनी दाखवलेला स्वाभिमान प्रेरणादायी असून या सुटकेनंतर महाराजांनी पुन्हा नव्याने स्वराज्य उभे केले. परकीयांचे दुराचारी शासन संपुष्टात आणून हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीची प्रेरणा राजमाता जिजाऊंनी महाराजांना दिली, स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आम्ही वाटचाल करत असून बलशाली भारत आणि बलशाली महाराष्ट्र निर्माण करण्याचा आमचा निर्धार आहे.’ (हेही वाचा: Free Chhaava Screening For 'Ladki Bahins': लाडक्या बहिणींसाठी 7 दिवस मोफत दाखवला जाणार 'छावा' चित्रपट; अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांची घोषणा)

दरम्यान, पुरंदरच्या तहानंतर, शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्र्याला बोलावले. दरबारात त्यांना कमी दर्जाच्या सरदारांसोबत उभे केले, ज्यामुळे महाराज अपमानित झाले. या अपमानामुळे त्यांनी निषेध केला, परिणामी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. नजरकैदेत असताना, महाराजांनी आजारी असल्याचे भासवून मिठाई वाटप सुरू केले. 17 ऑगस्ट 1666 रोजी, मिठाईच्या टोपल्यांमध्ये लपून ते आणि त्यांचा पुत्र संभाजी आग्र्याहून पलायन करण्यात यशस्वी झाले. या घटनेने औरंगजेबाची मानहानी झाली, तर शिवाजी महाराजांच्या धाडसाची कीर्ती अधिक वाढली.

(The above story first appeared on LatestLY on Feb 20, 2025 09:12 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).