Nepal Floods | (Photo Credit- X)

नेपाळची राजधानी काठमांडू (Floods) येथील सखल भाग रविवारी (29 सप्टेंबर) मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले. अनेक ठिकाणी भूस्खलन (Nepal Floods and Landslides) झाले. ज्यामुळे देशातील विविध भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचली. हाती आलेल्या माहितीनुसार, देशातील विविध भागात महापूर आला आहे. ज्यामुळे जवळपास 101 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक बेपत्ता आहेत. जून ते सप्टेंबर दरम्यान पडणारा मान्सून पाऊस (Monsoon Rains) अनेकदा संपूर्ण दक्षिण आशियामध्ये (South Asia Monsoon) प्राणघातक पूर आणि भूस्खलन घडवून आणतो. पाठिमागिली काही वर्षांमध्ये घडलेल्या घटनांवरुन निर्सर्गाचा एक पॅटर्न निरीक्षकांच्या लक्षात आले आहे. दरम्यान, तज्ञांनी असा इशारा दिला आहे की हवामान बदलामुळे या आपत्तींची वारंवारता आणि तीव्रता वाढत आहे. नद्या ओसंडून वाहत आहेत आणि रस्ते आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचाच एक परिणाम म्हणून पूर्व आणि मध्य नेपाळचा मोठा भाग शुक्रवारपासून पाण्याखाली गेला आहे.

नेपाळमध्ये महापूराने वाढला मृत्यूदर

नेपाळ पोलिसांनी सध्याच्या मृतांच्या संख्येला (101) दुजोरा दिला आहे. सोबतच असाही इशारा दिला की, बचाव पथक अधिक प्रभावित भागात पोहोचत आहे. मात्र, मान्सून पावसामुळे नैसर्गिक अढथळे निर्माण होत असल्याने मदत पोहचविण्यास विलंब होतो आहे. परिणामी मृतांच्या संख्येत वाढ होऊ शकते. पोलिस प्रवक्ते दान बहादूर कारकी यांनी ए. एफ. पी. ला सांगितले की बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे आणि आणखी बरेच जण दुर्गम भागात अडकले असण्याची शक्यता आहे. मृतांची संख्या 101 वर पोहोचली असून 64 जण बेपत्ता असल्याची अधिकृत माहिती आहे. पण, अद्याप माहिती उपलब्ध नसलेल्या पण बेपत्ता असलेल्यांची संख्या शेकडोंमध्ये असू शकते. आमचे शोध आणि बचाव कार्य प्रभावित भागात सुरू आहे. (हेही वाचा, Uttarkashi Landslides: उत्तराखंडमध्ये भूस्खलन, रस्त्यांवर खड्डे, मातीचे ढिगारे, कोणतीही जीवित हानी नसल्याचे वृत्त)

नेपाळमध्ये विक्रमी पाऊस

स्थानिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काठमांडूमध्ये केवळ 24 तासांत 240 मिलीमीटर (9.4 इंच) पाऊस पडला, जो 1970 नंतर शहरातील सर्वाधिक नोंद झालेला पाऊस आहे. बागमती नदी ( Bagmati River Flooding) आणि तिच्या उपनद्या ओसंडून वाहू लागल्या, त्यामुळे जवळपासची घरे आणि वाहने पाण्याखाली गेली, ज्यामुळे रहिवाशांना उंचावर स्थलांतरीत व्हावे लागले. मदत पथकाने आतापर्यंत 3,300 लोकांची सुटका केली आहे, परंतु अनेक भाग अजूनही पाण्याखाली आहेत. बचावकार्यात मदत करण्यासाठी हेलिकॉप्टर्स आणि मोटार बोटींसह 3,000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत आणि वाचलेल्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी राफ्टचा वापर केला जात आहे.

भूस्खलन आणि वाहतूक विस्कळीत

मुसळधार पावसामुळे भूस्खलनामुळे काठमांडूला देशाच्या इतर भागांशी जोडणारे अनेक प्रमुख महामार्ग बंद पडले आहेत, ज्यामुळे शेकडो प्रवासी अडकून पडले आहेत. काठमांडू वाहतूक पोलिस अधिकारी विश्वराज खडका यांनी सांगितले की भूस्खलनामुळे अनेक रस्त्यांचे विभाग दुर्गम बनले आहेत. प्राप्त माहितीनुसार आठ ठिकाणे अशी आहेत, ज्या ठिकाणी पावसामुळे दुर्गम भाग निर्माण झाला आहे. रस्ते खचले असून, संपर्क खंडीत झाला आहे.

दक्षिण आशियातील मान्सूनवर हवामान बदलाचा परिणाम

दक्षिण आशियातील वार्षिक पावसात मान्सूनचा वाटा 70-80 टक्के आहे, परंतु हवामान बदलाच्या परिणामामुळे अलिकडच्या वर्षांत पूर आणि भूस्खलनाची तीव्रता वाढली आहे. तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे की वाढत्या तापमानामुळे हवामानाच्या या घटना अधिक तीव्र होत आहेत, ज्यामुळे मृतांची संख्या वाढत आहे आणि अधिक व्यापक नाश होत आहे.

केवळ या वर्षीच नेपाळमध्ये पावसाशी संबंधित आपत्तींमुळे 260 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जुलैमध्ये चितवान जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या भूस्खलनामुळे 59 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या दोन बसेस नदीत कोसळल्या, परिणामी 20 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आणि अनेक अजूनही बेपत्ता आहेत.