Chandrayaan 2: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ISRO च्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचं कौतुक; हार न मानता प्रयत्न सुरू ठेवण्याचा सल्ला
Narendra Modi (Photo Credits: Twitter/ ANI)

इस्त्रोची चांद्रयान 2 ही चांद्रमोहिम अगदी शेवटच्या टप्प्यात आल्यानंंतर चंद्रापासून अवघ्या 2.1 किमी अंतरावर असताना  विक्रम लॅन्डरशी संपर्क तुटला. संशोधकांकडून या मोहिमेतील विक्रम लॅन्डरशी पुन्हा संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चांद्रयान 2 चं चंद्रावर सॉफ्ट लॅन्डिंग पाहण्यासाठी इस्त्रोच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते. मात्र के. सीवन या इस्त्रोच्या अध्यक्षांनी त्यांना सॉफ्ट लॅन्डिंग न झाल्याची माहिती दिल्यानंतर मोदींनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना धीर दिला तसेच त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. नरेंद्र मोदींनी आज सकाळी भारतीयांना उद्देशून खास संदेश दिला. यावेळेस त्यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञ आणि संशोधकांचं कौतुक केलं. काही दिवसांपूर्वीच चांद्रयान 2 ने पाठवलेला चंद्राचा पहिला फोटो इस्त्रोने शेअर केला होता.

मागील काही तासात नरेंद्र मोदी यांनी दुसर्‍यांदा इस्त्रो कार्यालयात शास्त्रज्ञांचं कौतुक करत  त्यांना धीर  दिला. यावेळेस इस्त्रो अध्यक्ष  के. सीवन यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यांना नरेंद्र मोदींनी जवळ घेत हार न मानता पुन्हा उमेदीने उभं राहण्याचा सल्ला दिला.  . मात्र या अपयशाने खचून न जाण्याचा सल्ला दिला आहे. देश तुमच्या पाठीशी आहे. अडचणी आल्या तरी हार मानू नका.काही तांत्रिक अडचणींमुळे आपण चंद्रावर उतरू शकलो नाही पण तुमचे प्रयत्न अभिमानास्पद आहेत. लवकरच आपले हे स्वप्नही सत्यात उतरेल. मोदींनी यावेळेस शास्त्रज्ञांच्या कुटुंबियांचेही कौतुक केले. चांद्रयान 2 मोहिमेतील अनुभव आपल्या पुढील मोहिमांसाठी फायदेशीर ठरेल. 21 व्या शतकामध्ये भारतीयांच्या आशा अपेक्षांना कुणीच रोखू शकत नाही.

ANI Tweet

 के. सीवन यांच्या अश्रूंचा बांध फुटला

चांद्रयान 2 हे 22 जुलै दिवशी श्रीहरिकोटा येथून अवकाशामध्ये झेपावले. त्यानंतर एक एक टप्पा पूर्ण करत आता अखेर अंतिम टप्प्यात पोहचले होते. 2 सप्टेंबर दिवशी दुपारी दीडच्या सुमारास चांद्रयान 2 चे लॅन्डर विक्रम ऑर्बिटरपासून वेगळे झाले होते.  Chandrayaan 2 Launch: ISRO च्या दुसऱ्या ऐतिहासिक चंद्र मोहिमेची 10 खास वैशिष्ट्यं

चंद्र मोहिमेच्या मदतीने चंद्राच्या दक्षिण धुव्रावर संशोधन केले जाणार होते. तेथील खनिजांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहिम महत्त्वाची असल्याचं सांगण्यात आले आहे. चंद्रयान मोहिमेमध्ये 13 पेलोड आणि 8 ऑर्बिट, 3 लॅन्डर आणि दोन रोव्हर होते. जीएलएसव्ही मार्क 3 (GSLV MK III)या प्रक्षेपकाद्वारा श्रीहरीकोटा येथून चांद्रयान 2 चे प्रक्षेपण झाले. भारताची ही चांद्र मोहीम यशस्वी झाली असती तर भारत हा अमेरिका ,चीन, व रशिया पाठोपाठ चंद्रावर उतरणारा जगातील चौथा देश ठरला असता.