ICC Cricket World Cup 2019 च्या स्पर्धेतून अंबाती रायुडू बाहेर; रायुडूच्या जागी 'या' खेळाडूला संघात स्थान देण्याची दिग्गजांची मागणी
Representational Image (Photo Credit: Twitter)

ICC Cricket World Cup 2019: भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायुडू ICC Cricket World Cup 2019 च्या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याऐवजी विजय शंकरला संघात स्थान देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. अंबाती रायुडूला मिळालेल्या संधीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी तो कमी पडला.

माजी भारतीय क्रिकेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांच्या म्हणण्यानुसार, येत्या वर्ल्ड कपमध्ये ऑलरॉऊंडर खेळाडू विजय शंकर (Vijay Shankar) याला चौथ्या क्रमांकवर खेळण्याची संधी मिळायला हवी. यापूर्वी या स्थानासाठी अंबाती रायडू (Ambati Rayudu) याच्या नावाचा विचार झाला होता. मात्र या संधीचा फायदा घेण्यात अंबाती कोठेतरी कमी पडला.

विजय शंकरमध्ये स्ट्राईक रोटेट करण्यासोबतच षटकार ठोकण्याचीही जबरदस्त क्षमता आहे. त्यामुळे त्याला फलंदाजाप्रमाणे खेळण्याची संधी द्यायला हवी. सध्या विजय शंकरला गोलंदाजाप्रमाणे खेळवले जात असून त्याला फक्त तीन ओव्हर्स टाकण्याची संधी दिली जाते. त्यामुळे जर 6-7 किंवा 10 ओव्हर टाकण्याची संधी त्याला मिळायला हवी, असे मांजरेकरांचे म्हणणे आहे.

तर चौथ्या क्रमांकवर असलेल्या अंबाती रायुडूबद्दल संजय मांजरेकर म्हणाले की, जेव्हा वेलिंग्टनमध्ये न्युझीलँडविरुद्ध 90 धावा केल्या होत्या तेव्हा मला विश्वास होता की त्याचे संघातील स्थान पक्के होईल. मात्र या मालिकेतील तीन सामन्यातील त्याचा खेळ पाहता त्याच्या ऐवजी विजय शंकरला संधी द्यायला हवी, असे वाटते.

तसंच ते पुढे म्हणाले की, विराट कोहलीच्या संघातील फलंदाजीचे स्थान न बदलता त्याला तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजी करायला हवी. कारण विराट सातत्याने चांगले करुन संघाला विजय मिळवून देतो.