India Playing XI vs Pakistan: सराव सामन्यात टीम इंडिया पास, पण पाकिस्तानविरुद्ध प्लेइंग इलेव्हनवर अडकला पेच; पहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup) 2021 सुपर-12 सामन्यांचा थरार आजपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याने होणार आहे. यानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामना 24 ऑक्टोबर रोजी दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. क्रिकेट विश्वातील या दोन कट्टर प्रतिस्पर्धी देशातील सामन्याची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. टी-20 विश्वचषकात (T20 World Cup) यापूर्वी दोन्ही संघ पाच वेळा आमने-सामने आले असून प्रत्येक वेळी टीम इंडियाचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या या हाय-वोल्टेज सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान दोन सराव सामने खेळले. भारताने त्यांचे दोन्ही सराव सामने जिंकले, तर पाकिस्तानने (Pakistan) 1 सामना जिंकला आणि 1 गमावला. दोन्ही सराव सामन्यात टीम इंडियाने (Team India) प्रभावी खेळ केला. त्यामुळे आता कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनापुढे प्लेइंग इलेव्हनचा पेच उभा राहिला आहे. (IND vs PAK, T20 World Cup 2021: पाकिस्तानला T20 क्रिकेटमध्ये एकटाच पुरून उरला Virat Kohli, झंझावाती रेकॉर्ड जाणून प्रतिस्पर्धी संघाला फुटेल घाम)

अशा स्थितीत टी-20 विश्वचषक 2021 मध्ये IND vs PAK लढतींपूर्वी आपण भारताच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबद्दल चर्चा करणार आहोत.

सलामीवीर (Openers)

रोहित शर्मा (Rohit Sharma), सर्व कालीन सर्वोत्तम व्हाईट-बॉल स्पेशलिस्ट, आघाडीवर असणे आवश्यक आहे कारण तो प्रतिस्पर्ध्यांना गंभीरपणे त्रास देऊ शकतो. 2019 मध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत जेव्हा अखेरीस भारत-पाकिस्तान आमने-सामने आले होते तेव्हा रोहितने धडाकेबाज शतक केले होते. दुसरीकडे केएल राहुल (KL Rahul) आयपीएल 2021 पासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि दोन दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्ध सराव सामन्यातही त्याची लय कायम होती. अशा परिस्थितीत रोहित आणि राहुलची सुरुवातील चांगली जोडी जमली तर पाकिस्तानच्या अडचणीत वाढ होऊ शकतात.

मधल्या फळीतील फलंदाज (Middle-order)

विराट कोहली (Virat Kohli), ईशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव टीम इंडियाच्या मधल्या फळीचे आधार स्तंभ असतील. पण कर्णधार कोहलीचा माफक फॉर्म काही काळापासून भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे आणि त्याने इंग्लंडविरुद्ध सराव सामन्यात खास धावा केल्या नाही. याशिवाय, किशनने मुंबई इंडियन्ससाठी आणि इंग्लंडविरुद्ध जोरदार धावा लुटल्या आहेत. आणि तो चौथ्या स्थानावर फलंदाजीला उतरेल. तर सूर्यासाठी आयपीएल 2021 विशेष ठरले नाही परंतु इंग्लंडविरुद्ध तो लयीत परतल्याने दिसत आहे. भारताच्या विजयासाठी या मधल्या फळीला अप्रत्याशित प्रतिस्पर्ध्याविरुद्ध एकत्रितपणे हल्लाबोल करणे आवश्यक आहे.

अष्टपैलू (All-rounders)

हार्दिक पांड्या भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे. तो आता सध्या लयीत देखील नाही आहे आणि त्याला बॅटसोबत गोलंदाजी करणे देखील गरजेचे आहे. तथापि तो गोलंदाजी करेल अशी शक्यता फारच कमी आहे आणि त्यामुळे त्याच्यावर फलंदाज म्हणून योगदान देण्याचे अधिक दडपण येईल. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जच्या संथ सुरुवातीनंतर रवींद्र जडेजा त्याच्या सर्वोत्तम स्थितीत परतला आहे. भारताला एक फलंदाज म्हणून जडेजाच्या तुफान फलंदाजीची आवश्यकता असेल आणि अचूक फिरकीने प्रतिस्पर्ध्यांवर नक्कीच तो दडपण आणू शकतो. विशेष म्हणजे हार्दिक आणि जडेजा एक फिल्डर म्हणून देखील महत्वपूर्ण असतील.

गोलंदाज (Bowlers)

शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांच्यावर गोलंदाजी हल्ल्याची जबाबदार असेही. आणि भारतासाठी चांगली बातमी म्हणजे, या ब्रिगेडपैकी प्रत्येक खेळाडू उत्तम फॉर्ममध्ये आहे, तरीही दुबई स्टेडियमकच्या खेळपट्टीचे संथ स्वरूप लक्षात घेऊन भारत दुसऱ्या फिरकीपटूच्या समावेशावर विचार करू शकतो.