IND vs PAK, T20 World Cup 2021: पाकिस्तानला T20 क्रिकेटमध्ये एकटाच पुरून उरला Virat Kohli, झंझावाती रेकॉर्ड जाणून प्रतिस्पर्धी संघाला फुटेल घाम
विराट कोहली (Photo Credit: PTI)

टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) 2021 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) संघात 24 ऑक्टोबर रोजी काट्याची टक्कर होणार आहे. 2019 वनडे विश्वचषकनंतर दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी पहिल्यांदा आमनेसामने येणार आहेत. दोन शेजारी देशातील या सामन्याची चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. टी-20 विश्वचषक 2021 मध्ये सर्वांच्या नजरा कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) असतील. सध्या फलंदाज म्हणून विराटची कामगिरी फारशी चांगली राहिली नसून पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध मोठी खेळी खेळून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावण्याचा त्याचा प्रयत्न अरेल. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विराट कोहली पाकिस्तानला एकटाच पुरून उरला आहे आणि पुन्हा एकदा विराट कोहलीने  मागील सामन्यांप्रमाणे पाकिस्तानसाठी मोठा अडथळा ठरू शकतो. विराटला पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली नाही, पण जेव्हा-जेव्हा टीम इंडिया (Team India) वनडे आणि टी-20 मध्ये पाकिस्तानशी भिडली आहे, तेव्हा विराटने धावांचा पाऊस पाडला आहे. (T20 क्रिकेटमध्ये ‘या’ भारतीय फलंदाजाचा यूएईमध्ये आहे जबरदस्त रेकॉर्ड, पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियासाठी ठरू शकतो ‘ट्रम्प कार्ड’)

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत एकूण 6 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 84.66 च्या सरासरीने तब्ब्ल 254 धावा केल्या आहेत. इतकंच नाही तर त्याने पाकिस्तानविरुद्ध सहा सामन्यांमध्ये दोन अर्धशतके झळकावली आहेत आणि यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 118.19 आहे. विराट पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या 6 पैकी शेवटच्या तीन डावात नाबाद राहिला आहे. विराटने 2012 मध्ये कोलंबोमध्ये पाकिस्तानविरुद्ध 78 नाबाद, 2014 मध्ये ढाकामध्ये 36 नाबाद आणि कोलकाता येथे 2016 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 55 नाबाद धावा केल्या.

दुसरीकडे, विराट कोहलीचा घराबाहेर फलंदाजी आकडेवारी देखील खूप चांगली आहे. त्याने घराबाहेर खेळल्या गेलेल्या 36 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 33 डावांमध्ये 45.88 च्या सरासरीने 1,193 धावा केल्या आहेत. कोहलीने आतापर्यंत UAE मध्ये एकही आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळलेला नाही. पण आशियातील त्याचा टी-20 रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्याने आशियामध्ये खेळल्या गेलेल्या 55 सामन्यांच्या 53 डावांमध्ये 63.47 च्या सरासरीने आणि 141.04 च्या स्ट्राइक रेटने 1530 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 21 अर्धशतके झळकावली आहेत. यामध्ये नाबाद 94 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. उल्लेखनीय आहे की विराटला आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये तिहेरी आकड्यांचा टप्पा गाठता आलेला नाही. अशा परिस्थितीत आयपीएल 2021 मध्ये 15 सामन्यांमध्ये 405 धावा करणाऱ्या विराट कोहलीची बॅट पाकिस्तानविरुद्ध तळपली तर टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध विजयी षटकार ठोकण्यात नक्कीच यशस्वी होईल.