केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आज (25 जुलै) अखेर आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला आहे. सोशल मीडियावर पत्र पोस्ट करत त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. NEET पेपरफुटी प्रकरणावरून गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातील जनदबावाखाली झालेला हा पहिला राजीनामा मानला आहे. राजीनाम्याची घोषणा झाल्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "आम्ही हे करून दाखवले. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे." घाबरण्याचे कारण नाही, ही लोकशाही आहे, अशी भावना व्यक्त करत त्यांनी जंतरमंतर वर जल्लोष केला आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे कारण काय?
धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पत्रात लिहिले की, जंतर मंतर आणि देशभरातील इतर ठिकाणची परिस्थिती लक्षात घेता, तसेच देशविरोधी शक्तींना या परिस्थितीचा गैरफायदा घेता येऊ नये, राष्ट्रीय एकता कायम राहावी आणि कोणत्याही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नये यासाठी आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी आपले लक्ष अभ्यासावर आणि करिअर घडवण्यावर केंद्रित करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांनी दिलेले मार्गदर्शन, विश्वास आणि सतत पाठिंब्याबद्दल त्यांनी मोदींचे आभारही मानले. पंतप्रधानांनी अद्याप हा राजीनामा स्वीकारलेला नाही.
कॉकरोच जनता पार्टी आंदोलनाची पार्श्वभूमी
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सुरुवातीला अभिजीत दीपके आणि त्यांच्या कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) सुरू केलेल्या ऑनलाइन आंदोलनातून पुढे आली होती. कालांतराने या आंदोलनाला विद्यार्थी, तरुण वर्ग, त्यांचे हितचिंतक आणि विविध विरोधी पक्षांचा व्यापक पाठिंबा मिळाला. २० जुलै रोजी दिल्ली पोलिस आणि आरएएफकडून विद्यार्थ्यांच्या शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर कठोर कारवाई झाल्यानंतर जनभावना अधिकच तीव्र झाली.
केंद्र सरकार सीजेपीच्या प्रतिनिधींसोबत सातत्याने चर्चा करत होते. प्रधान यांचा राजीनामा ही बिनशर्त मागणी असल्याचे सीजेपीने स्पष्ट केले होते, तसेच एक-दोन दिवसांत राजीनामा न मिळाल्यास देशभरात अधिक व्यापक आणि तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
अभिजीत दीपके यांची प्रतिक्रिया
#WATCH | Delhi: On the resignation of Union education minister Dharmendra Pradhan, Founding President of Cockroach Janta Party, Abhijeet Dipke says, "There's no need to be afraid. This is democracy. He has resigned, but we have two more demands. We won't go like this. Dharmendra… pic.twitter.com/K8xiZ0NInO
— ANI (@ANI) July 25, 2026
राजीनाम्याची घोषणा झाल्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजीत डिपके यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "आम्ही हे करून दाखवले. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे." घाबरण्याचे कारण नाही, ही लोकशाही आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मात्र आंदोलन अद्याप पूर्णपणे संपलेले नसल्याचे डिपके यांनी स्पष्ट केले. "प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. मात्र आमच्या आणखी दोन मागण्या शिल्लक आहेत. आम्ही असेच जाणार नाही," असे ते म्हणाले. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, ही पहिली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. तर, २० जुलै रोजी कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, ही दुसरी मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले. नक्की वाचा: Abhijeet Dipke यांना Typhoid चे निदान.
पुढील आंदोलनाची दिशा
आपल्या प्रतिक्रियेत दीपके यांनी सरकारला इशारा देत म्हटले की, "कॉकरोचशी पंगा घेऊ नका." उर्वरित दोन्ही मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याआधीच स्पष्ट केले होते की, प्रधान यांना केवळ दुसऱ्या मंत्रालयात हलवणे स्वीकारार्ह नाही, त्यांना पूर्णपणे पदावरून हटवलेच पाहिजे.
का सुरू होते जंतरमंतर वर तरूणाईचं आंदोलन
१२ मे रोजी राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) ३ मे रोजी झालेली NEET-UG परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांमुळे रद्द केली होती. यानंतर सुरू झालेल्या आंदोलनाने हळूहळू देशव्यापी स्वरूप धारण केले. कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत २६ दिवसांचे उपोषण केले होते, जे त्यांनी सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर नुकतेच संपवले होते.