'कुमकूम भाग्य' या लोकप्रिय मालिकेत काम केलेली 25 वर्षीय टेलिव्हिजन अभिनेत्री संचिता उगले हिने मुंबईतील नालासोपारा येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी, १४ जून रोजी संध्याकाळच्या सुमारास तिने राहत्या घरात गळफास लावून आपले आयुष्य संपवले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण टेलिव्हिजन विश्वात आणि तिच्या चाहत्यांमध्ये तीव्र संताप व हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संचिता उगले नालासोपारा पूर्व येथील आचोले गावातील साई संतोषी बिल्डिंगमध्ये तिच्या पालकांसह आणि बहिणीसह राहत होती. १४ जून रोजी संध्याकाळी ७ ते ७.३० च्या दरम्यान तिने स्वतःला बेडरूममध्ये कोंडून घेतले होते. घटनेच्या वेळी ती घरात एकटीच असल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी तिला तात्काळ वसई-विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
आचोले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचिताने बेडरूममध्ये साडीच्या सहाय्याने सिलिंग फॅनला गळफास घेतला होता. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. संचिताचे वडील मच्छिंद्र उगले यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी १५ जून रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १९४ अंतर्गत अकस्मात मृत्यूची (ADR) नोंद केली आहे. संचिताने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी अधिक तपास करत आहेत.
संचिता उगले कोण होती?
4 मार्च 2001 रोजी जन्मलेली संचिता उगले तिच्या निधनाच्या वेळी 25 वर्षांची होती. महाराष्ट्रातील संगमनेर येथील एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या संचिताने लहानपणापासूनच टेलिव्हिजन अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहिले होते. तिने सुरुवातीला आपल्या कुटुंबाला थेट न सांगताच अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. घरी इतर अभ्यासासाठी जात असल्याचे सांगून ती गुपचूप थिएटरच्या (नाट्य) वर्गांना हजेरी लावायची. तिची ही मेहनत आणि जिद्द पाहून, पुढे जेव्हा तिला अभिनयाचे प्रोजेक्ट्स मिळू लागले, तेव्हा तिच्या कुटुंबानेही तिला पूर्ण पाठिंबा दिला.
संचिता उगले ही केवळ 25 वर्षांची होती आणि तिने मनोरंजन क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली होती. झी टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका 'कुमकूम भाग्य'मध्ये तिने भूमिका साकारली होती. या दीर्घकाळ चाललेल्या मालिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली आणि तिच्या करिअरला कलाटणी मिळाली, असे तिने पूर्वी सांगितले होते. याशिवाय तिने 'वागळे की दुनिया' मालिकेत आणि दंगल टीव्हीवरील एका मालिकेतही काम केले होते.
दूरचित्रवाणी मालिकांशिवाय संचिताने चित्रपटांमध्येही काम करण्यास सुरुवात केली होती. विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या 'छावा' या ऐतिहासिक चित्रपटात तिने तारा राणी यांच्या तरुणपणीची भूमिका साकारली होती. तसेच, ज्येष्ठ अभिनेते मनोज वाजपेयी यांच्या 'सायलेन्स २: द नाईट आऊल बार शूटआऊट' या ओटीटी चित्रपटातही तिने महत्त्वाची भूमिका निभावली होती. तिच्या अचानक जाण्याने सोशल मीडियावर तिचे चाहते आणि सहकलाकार दुःख व्यक्त करत आहेत.