
ICC T20 World Cup 2024 Final: टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकाशी (IND vs SA) होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे आज म्हणजेच 29 जून रोजी रात्री 8 वाजता खेळवण्यात येणार आहे. टी-20 वर्ल्ड कपबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडिया 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अंतिम फेरीत पोहोचली आहे. त्याचवेळी आयसीसीच्या स्पर्धांवर नजर टाकली तर टीम इंडियाला उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी गाठूनही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. पण आजा भारताला विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. मात्र त्यापुर्वी अंतिम सामन्यात पावसाचा धोका निर्माण झाला आहे. (हे देखील वाचा: Team India Record In Barbados: बार्बाडोसमध्ये भारताचा कसा आहे विक्रम? वाचा जगज्जेतेपदाच्या सामन्यापूर्वी धक्कादायक आकडेवारी)
भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्यावर पावसाचे सावट
AccuWeather च्या अहवालानुसार, 29 जून रोजी ब्रिजटाउन, बार्बाडोसमध्ये दिवसभर पावसाची शक्यता 78% पर्यंत आहे. यासोबतच जोरदार वारेही वाहू शकतात आणि ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. रात्री पावसाची शक्यता 87 टक्के आहे. 30 जून हा अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहे. मात्र या दिवशीही पावसाचा धोका असून पाऊस क्रिकेट चाहत्यांची मजा खराब करु शकतो. 30 जून रोजी पावसाची शक्यता 61 टक्के आणि रात्री 49 टक्क्यांपर्यंत आहे. अशा स्थितीत राखीव दिवशीही सामना होण्याची शक्यता नाही.
दोन्ही संघ होऊ शकतात विजेते
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्यासाठी आयसीसीने 30 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवला आहे. सर्वप्रथम 29 जून रोजी होणारा सामना आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. जर पावसामुळे सामना झाला नाही तर त्यानंतर राखीव दिवशी खेळला जाईल. राखीव दिवशी, सामना 29 जून रोजी थांबला तिथून सुरू होईल. पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे राखीव दिवशीही सामना खेळला गेला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.