Shivajinagar-Hinjawadi Metro Line 3

पुण्यातील (Pune) वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी आणि हिंजवडी आयटी हबला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडण्यासाठी सुरू असलेल्या, शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो लाईन 3 (Shivajinagar-Hinjawadi Metro Line 3) च्या कामाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (PMRDA) 4 जुलै 2025 रोजी माण डेपो ते पीएमआर-4 स्टेशनदरम्यान या मेट्रो मार्गाची पहिली चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. या 23.3 किमी लांबीच्या पूर्णपणे उन्नत (एलिव्हेटेड) मार्गाचे 87% काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाची पूर्णत्वाची अंतिम मुदत मार्च 2026 निश्चित करण्यात आली आहे.

टाटा आणि सिमेन्स यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड अंतर्गत, सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलवर हा प्रकल्प विकसित होत आहे. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो लाईन 3 ही पुण्यातील माण गावापासून शिवाजीनगर येथील डिस्ट्रिक्ट कोर्टापर्यंत 23.3 किमी लांबीचा पूर्णपणे उन्नत मार्ग आहे. या मार्गावर 23 स्थानके असतील, ज्यामुळे हिंजवडी आयटी हबमधील 1 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना प्रवास सुलभ होईल. या प्रकल्पाची सुरुवात 25 नोव्हेंबर 2021 रोजी झाली, आणि सुरुवातीला मार्च 2025 मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र, जमीन संपादन, परवानग्या आणि तांत्रिक अडचणींमुळे ही मुदत प्रथम सप्टेंबर 2025 आणि नंतर मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली.

Shivajinagar-Hinjawadi Metro Line 3:

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या 87% काम पूर्ण झाले आहे, आणि माण डेपो ते पीएमआर-4 स्टेशनदरम्यान 4 जुलै 2025 रोजी यशस्वी चाचणी घेण्यात आली. या मार्गावरील व्हायाडक्टचे काम जवळपास पूर्ण झाले असून, स्थानकांचे बांधकाम, विद्युत यंत्रणा, सिग्नलिंग आणि इतर तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आहेत. चाचणीच्या या 11 किमी लांबीच्या टप्प्यावर मेट्रो रेल्वेची यशस्वी चाचणी घेण्यात आली, ज्यामुळे मार्गाची तांत्रिक व्यवहार्यता आणि सुरक्षितता तपासली गेली. अभियंता रिनाज पठाण यांनी सांगितले की, ;हा मार्ग एकाच टप्प्यात उघडला जाईल, आणि प्रवासी सेवेसाठी मार्च 2026 पर्यंत पूर्ण तयारी होईल.’ (हेही वाचा: महाराष्ट्रात नवीन वाहन खरेदी करणे झाले महाग; मोटार वाहन कर कायद्यातील सुधारणांचा परिणाम)

हा 23.3 किमी लांबीचा मार्ग पुणे-बेंगळुरू महामार्ग आणि मुळा नदी ओलांडून जाईल, आणि मेगापोलिस सर्कल, शिवाजी चौक, वाकड चौक, बाणेर, साकाळ नगर, आणि सिव्हिल कोर्ट यासारख्या 23 स्थानकांवर थांबेल. या मार्गामुळे शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यानचा प्रवास वेळ 35-40 मिनिटांपर्यंत कमी होईल, ज्यामुळे सध्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे तासभर लागणारा प्रवास सुलभ होईल. या मार्गावर दर तासाला 30,000 प्रवाशांना सेवा देण्याची क्षमता आहे. सिव्हिल कोर्ट स्थानकावर महामेट्रोच्या इतर मार्गांशी जोडणी असेल, ज्यामुळे पुण्यातील एकात्मिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत होईल.