Rajya sabha Election 2022: महाराष्ट्रात दोन तपानंतर राजकीय परिस्थितीची पुनरावृत्ती?  शरद पवार यांच्या खेळीला उजाळा; जाणून घ्या काय घडलं होतं नेमकं?
Sharad Pawar | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात प्रदीर्घ काळानंतर म्हणजेच जवळपास 24 वर्षांनंतर राज्यसभा निवडणूक (Rajya sabha Election 2022) लागली आहे. राज्यात आज ज्या राजकीय परिस्थितीत निवडणूक लागली आहे तशीच परिस्थिती 1998 मध्ये निर्माण झाली होती. उल्लेखनीय असे की त्या वेळीही सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते आणि आताही सहाच जागेसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. जवळपास दोन तपानंतर राजकीय परिस्थितीची पुनरावृत्ती झाली आहे. राज्यसभा निवडणुकीची तशी फारशी दखल घेतली जात नाही पण त्या वेळी मात्र ही निवडणूक राज्यभर गाजली होती. त्यातूनच पुढे काँग्रेसच्या फुटीची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेची बिजे रोवली गेली असे मानतात. शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या राजकीय खेळीमुळेच हे तेव्हा हे सगळे घडल्याचे बोलले गेले. आजही शरद पवार यांच्या त्या ज्ञात-अज्ञात खेळीची चर्चा होते. काय घडले होते तेव्हा? घ्या जाणून..

राज्यसभा निवडणूक 1998

राज्यसभेची निवडणूक लागली होती. महाराष्ट्रातून सहा जागा होत्या. त्यामुळे सहाजिकच सहा उमेदवार निवडून जाणार होते. काँग्रेस तेव्हा सत्तेत होता. सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या मतांच्या कोट्याप्रमाणे उमेदवार दिले. त्यामुळे सहाजिकच सर्व उमेदवार बिनविरोध निवडून जातील अशी आपेक्षा होती. घडले भलतेच ऐनवेळी दोन अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले. एक अपक्ष होते विजय दर्डा आणि दुसरे अपक्ष होते सुरेश कलमाडी. सुरेश कलमाडी यांनी काँग्रेसमधून फुटून वेगळी आघाडी केली होती आणि ते राज्यसभेच्या रिंगणात होते. सहाव्या जागेसाठी तत्कालीन केंद्रीय गृहसचिव राम प्रधान हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. काँग्रेसकडे मतांचा कोटा असल्याने प्रधान निवडून येणार हे निश्चित होते. भीती फक्त एकच होती. जी पुढे खरी ठरली. त्या वेळी गुप्त मतदान पद्धती होती आणि आमदार अपक्षांना पाठिंबा देणार नाहीत हे कशावरुन? या विचाराने काँग्रेस जनांच्या पोटात गोळा आला होता. घडलेही तसेच.

नेमके काय घडले

राज्यसभेसाठी (1998) सात उमेदवारांनी अर्ज दाखल कले. जागा सहा आणि उमेदवार सात. त्यामुळे एकजण पराभूत होणार हे नक्की. उत्सुकता येवढीच होती की पराभूत होणारा सातवा कोण?

उमेदवार (1998)

काँग्रेस

नजमा हेपतुल्ला (Najma Heptullah)

राम प्रधान (Ram Pradhan)

शिवसेना

प्रितीश नंदी ( Pritish Nandi)

सतिश प्रधान (Satish Pradhan)

भाजप

प्रमोद महाजन (Pramod Mahajan)

अपक्ष

सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi)

विजय दर्डा ( Vijay Darda)

राज्यसभा निवडणूक 2022 आणि 1998 मध्ये समान धागा हा की त्याही वेळी सहा उमेदवारच रिंगणात होते. आणि त्याही वेळी मतांचा कोटा हा 42 होता. आताही जागा सहा आणि मतांचा कोटाही जवळपास 42 इतकाच आहे. पाच उमेदवार सुरक्षीत होते. सहाव्या जागेसाठी काँग्रेसच्या पोतडीत 80 आमदार असल्याने अपक्षांच्या मदतीने काँग्रेसचे राम प्रधान सहज विजयी होऊ शकत होते.

घडले भलतेच

गुप्त मतदान पद्धती असल्याने काँग्रेसचे आमदार फुटले. परिणामी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राम प्रधान पराभूत झाले. हा पराभव काँग्रेस नेतृत्वाच्या जिव्हारी लागला. त्यातून तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित देशमुख यांचे निलंबन झाले. काँग्रेस आमदारांना पक्षाने कारवाई करत कारणे दाखवा नोटीसही पाठवली. त्या वेळी शरद पवार हे काँग्रेसमध्ये होते.

शरद पवार यांची खेळ?

राजकीय वर्तुळात तेव्हा बोलले गेले की शरद पवार यांनी विजय दर्डा यांना अप्रत्यक्ष मदत केली होती. तसेच, काँग्रेसची मते फुटण्यासाठी सुरेश कलमाडी यांची उमेदवारी होती. खरे तर अद्यापही हे पुढे येऊ शकले नाही की शरद पवार यांनी नेमकी मदत कोणाला केली? सुरेश कलमाडी की विजय दर्डा? पुढे एक घटना मात्र नक्की घडली. 1998 मध्ये राज्यसभा निवडणूक पार पडली आणि पुढे सोनिया गांधी यांच्या विदेशी असण्याचा मुद्दा उपस्थित केल्याने शरद पवार हे काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.

1998 च्या राज्यसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाला. इतके सगळे होऊनही काँग्रेसचा अधिकृत उमेदवार पराभूत झाला तो झालाच. तेव्हापासून महाराष्ट्रात राज्यसभा, विधानपरिषद अशा निवडणुका परस्पर संमतीने बिनविरोधच घ्यायच्या असा एक अलिखीत नियम तयार झाला. पाठीमागील जवळपास 24 वर्षे तो पाळला गेला. आता मात्र त्याला फाटा दिला गेला. शेवटी राज्यसभा निवडणूक लागलीच.

राज्यसभा निवडणूक 2022

महाराष्ट्रातून 2022 मध्येही राज्यसभेसाठी 6 जागाच आहेत. उमेदवार मात्र सात. सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक रिंगणात आहेत. त्यामुळे आता काय घडते याबाबत उत्सुकता आहे. 1998 प्रमाणे आताही कोण कोणती राजकीय खेळी खेळणार याबाबत उत्सुकता आहे. या वेळी आमदारांची फुटाफूट रोखण्यासाठी त्यांना सुरक्षीत ठिकाणी ठेवण्याची खबरदारी सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडूनही घेण्यात आली आहे. शिवाय अपक्षांनाही गळाला लावण्याचे काम सुरु आहे. काय घडते याबाबत उत्सुकता आहे.