Photo Credit- X

प्रयागराज (Prayagraj) येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ मेळा (Mahakumbh 2025) आयोजित केला आहे. हा जगातील सर्वांत मोठा शांततापूर्ण धार्मिक समारंभ आहे, ज्यामध्ये लाखो भक्त पवित्र गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी एकत्र येतात. अशा मोठ्या प्रमाणावर लोकांच्या उपस्थितीमुळे, विशेषतः या पवित्र नद्यांमध्ये, पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते. आता बातमी आली आहे की, कुंभमेळ्याच्या पाण्यात असे बॅक्टेरिया आहेत ज्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात अनेक ठिकाणी गंगा आणि यमुनेचे पाणी आंघोळीसाठी योग्य नाही. संगमवर अनेक ठिकाणी फेकल कोलिफॉर्म (Faecal Coliform) बॅक्टेरियाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) एक अहवाल दाखल केला आहे आणि ही माहिती राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला दिली आहे. सीपीसीबीच्या मते, फेकल कॉलिफॉर्म हे सांडपाण्याच्या प्रदूषणाचे सूचक आहे. 12, 13, 14 15 आणि 19 जानेवारी रोजी गोळा केलेल्या नमुन्यांवर आधारित, सीपीसीबीने 3 फेब्रुवारी रोजी एनजीटीला गुणवत्ता मूल्यांकन अहवाल सादर केला.

अहवालानुसार, महाकुंभ सुरू झाल्यापासून, प्रयागराजमधील विविध ठिकाणी फेकल कॉलिफॉर्मचे प्रमाण आंघोळीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याच्या गुणवत्तेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत, महाकुंभात 50 कोटींहून अधिक लोकांनी गंगा नदीत स्नान केले आहे. अहवालात असे म्हटले आहे की, पाण्यात फेकल कॉलिफॉर्मचे प्रमाण 100 मिली पाण्यात 2500 युनिट्सपेक्षा खूपच जास्त आढळून आले. प्रयागराजमधील गंगा आणि यमुना नद्यांमध्ये सांडपाणी वाहून नेण्याबाबतच्या प्रकरणाची सध्या एनजीटी सुनावणी करत आहे.

महाकुंभमेळ्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन योजनेबाबत एनजीटीने आधीच उत्तर प्रदेश सरकारला निर्देश दिले आहेत. एनजीटीने आपल्या कडक टिप्पणीत उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला (यूपीपीसीबी) फटकारले आणि म्हटले की, ‘तुम्ही 50 कोटी लोकांना सांडपाण्याच्या दूषित पाण्याने आंघोळ करायला लावली. ते पाणी जे आंघोळीसाठीही योग्य नव्हते, लोकांना त्या पाण्याने तोंड धुवावे लागले.’

हे जीवाणू मानव आणि प्राण्यांच्या विष्ठा आणि मूत्राद्वारे पाण्यात पोहोचतात. जेव्हा घाण, सांडपाणी किंवा मूत्राचे पाणी नदीत मिसळते तेव्हा हे जीवाणू देखील पाण्यात जातात. संगमावर मोठ्या संख्येने लोक स्नान करतात आणि धार्मिक विधी करतात आणि कधीकधी कचराही पाण्यात टाकला जातो. यामुळे तिथे पाण्यात फेकल कॉलिफॉर्मचे प्रमाण वाढले आहे. संगमाच्या पाण्यात फेकल कोलिफॉर्म बॅक्टेरियाची उपस्थिती अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकते. यामुळे त्वचेचे आजार, अतिसार, मूत्रमार्गाचा संसर्ग, सेप्सिस, टायफॉइड आणि गॅस्ट्रोएन्टेरिटिस सारखे आजार उद्भवू शकतात.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कुंभमेळ्यावरून परतणाऱ्यांमध्ये आरोग्याच्या समस्या दिसून येत आहेत. काही लोकांना विषाणूजन्य, गॅस्ट्रो-एंटेरिटिसच्या समस्या येत आहेत, ज्यामध्ये अतिसार, उलट्या यांचा समावेश आहे. मात्र, इतक्या मोठ्या कार्यक्रमात हे प्रकरण खूप कमी आहेत. कारण इतक्या मोठ्या गर्दीत हे घडणे स्वाभाविक आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज येथील पाण्याची गुणवत्ता स्नान करण्यासाठी आणि 'आचमन' (पवित्र पाणी पिण्यासाठी) योग्य असल्याचे प्रतिपादन केले आहे. (हेही वाचा: Mahakumbh 2025: महाशिवरात्रीला, पवित्र शाही स्नानाचा शुभ मुहूर्त आणि महत्व, येथे जाणून घ्या संपूर्ण माहिती)

या वृत्तांवर प्रतिक्रिया देताना, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, त्रिवेणी येथील पाण्याच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र संगम आणि त्याच्या आसपासच्या सर्व पाईप्स आणि नाल्यांना टॅप लावण्यात आला आहे आणि शुद्धीकरणानंतरच पाणी सोडले जाते. उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी सतत देखरेख करत आहे. महाकुंभ मेळ्याच्या आयोजनाच्या वेळी, सरकारने पाण्याच्या स्वच्छतेसाठी विशेष प्रयत्न आणि उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये मलजल व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, आणि पाण्याच्या गुणवत्तेचे नियमित परीक्षण यांचा समावेश आहे.