मधुमेह कंट्रोल मध्ये ठेवण्यात किचन मधील हे जिन्नस करतील मदत; जाणून घ्या झटपट घरगुती उपाय
Diabetes (Photo Credits: Pixabay)

जगभरावर सध्या कोरोनाचे (Coronavirus)  संकट असताना वयोवृद्ध आणि अन्य व्याधी असणाऱ्या मंडळींना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले जातेय. कोरोनाची बाधा झालेल्यांची आकडेवारी पाहता यामध्ये सर्वाधिक रुग्णांना मुख्यतः मधुमेह (Diabetes) आणि हायपरटेन्शन (Hyper Tension) सारखे आजार असल्याचे दिसून आले आहे. अर्थात याचा उद्देश तुम्हाला घाबरवणे नसून तुम्हाला दक्ष राहण्याचे आवाहन करत आहोत, तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीत कोणाला जर का मधुमेहाचा आजार असेल तर याकाळात अशांनी खास काळजी घ्यायला हवी. यासाठी तुमच्या रेग्युलर औषधांसोबतच काही घरगुती उपचार केल्यास अधिक फायदा होऊ शकतो, हे उपचार शोधण्यासाठी तुम्हाला फार लांब नाही तर तुमच्या घरातच तुम्हाला हे उपाय सापडतील. किचन मधील काही सर्वसाधारण जिन्नस वापरून तुम्ही मधुमेह आटोक्यात ठेवू शकाल. कोणते आहेत हे नैसर्गिक उपाय चला तर जाणून घेऊयात..

मधुमेह कसा कंट्रोल कराल?

 

  • मेथी दाण्याचे पाणी

मेथी दाणे हे मधुमेहासाठी उत्कृष्ट औषध म्हणून ओळखले जातात. रात्रभर एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मेथी दाणे भिजवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी हे पाणी प्या. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहाते.

  • तुळशीचे पान

तुळशीच्या पानामध्ये अँटिऑक्सिडंट गुण असतात. इन्सुलिनसाठी ही तुळशीची पानं मदतगार ठरतात. रिकाम्या पोटी तुम्ही रोज तुळशीची दोन ते तीन पानं खाल्ल्यास अथवा एक चमचा रोज तुळशीचा रस प्यायल्यास, मधुमेह कमी होण्यास मदत होते.

  • लवंग

लवंग हा मसाल्याचा प्रकार मधुमेहासाठी अगदी कमालीचा सिद्ध होतो. रोज लवंगची एक कळी खाल्ली तर त्याचा मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी उपयोग होतो. याशिवाय लवंगाचा एकूणच शरीराचे पचनचक्र व्यवस्थित ठेवण्यात मदत होते.

  • कडीपत्ता

कडिपत्त्या मधील कडवटपणा मधुमेहासाठी मारक ठरतो. रोज कडिपत्त्याची पानं चावून खाल्लीत तर शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा फायदा होतो.

  • फळभाज्यांचे रस

मधुमेह कमी करण्यासाठी एक टोमॅटो, एक काकडी आणि एक कारल्याचं ज्यूस घ्या आणि ते एकत्र करून प्या. हे ज्यूस सकाळी रिकाम्या पोटी घेतल्याने मधुमेह कमी होती.

  • आळशी

    एक ग्लास कोमट पाण्यात एक टेबलस्पून अळशीची पूड घालून दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. 2 टेबलस्पूनपेक्षा जास्त पूड खाणे शरीरासाठी हानिकारक असते. (आळशीच्या बिया खाल्याने जेवणानंतरच्या शर्करेची पातळी जवळपास 28% पर्यंत कमी होते.)

मधूमेह असणाऱ्या व्यक्तींनी पथ्याकडे आणि व्यायामाकडे अगदी आवर्जून लक्ष द्यावे. गोड पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक्स या पदार्थापासून दूर राहून, कार्ब्स, प्रोटीन आणि हायफायबर पदार्थ यांचा समतोल आहार घ्यावा. मधुमेह हा बरा होण्यासारखा आजार आहे, त्यामुळे चिंता करू नये तणावामुळे आजारांना खतपाणी मिळते हे नेहमी लक्षात ठेवून मन आनंदी ठेवावे.

(टीप: वरील उपचार हे प्राप्त माहितीनुसार देण्यात आले आहेत, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. कोणत्याही पदार्थाची ऍलर्जी असल्यास आधी आपल्या डॉक्टरांशी बोलून मगच निर्णय घ्यावा)