Tamil Nadu: जयललिता यांचे घर Veda Nilayam मधील वस्तू सरकारच्या ताब्यात; सापडले 4 किलो सोने, 601 किलो चांदी, 10 हजार कपडे अशा 32,721 गोष्टी (See List)   
Former Tamil Nadu Chief Minister J Jayalalithaa (Photo credit: PTI/File)

तामिळनाडू सरकारने (Tamil Nadu Government) दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता (J Jayalalitha) यांचे घर ‘वेद निलयम’चे (Veda Nilayam) अधिग्रहण करण्यासाठी, शहरातील दिवाणी न्यायालयात 67 कोटी रुपयांचे सामान जमा केले आहे. सरकार या माजी मुख्यमंत्र्यांच्या घराचे रुपांतर स्मारकात करणार आहे. या चल-स्थावर मालमत्ता यादीमध्ये सुमारे चार किलोग्राम सोने, 601 किलो चांदी, 8,300 हून अधिक पुस्तके, 10,438 कपडे आणि पूजेसाठी वापरल्या जाणार्‍या वस्तूही  सापडल्या आहेत. डिसेंबर 2017 मध्ये जयललिता यांच्या निधनापूर्वी त्या तीन मजली इमारत 'वेद निलयम' मध्ये राहत होत्या.

2017 मध्ये राज्य सरकारने या मालमत्तेचे स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा केली होती. गेल्या महिन्यात, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी, दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांचे निवासस्थान तात्पुरते ताब्यात घेण्याचा अध्यादेश काढला. सरकारने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, जयललिता यांचे निवासस्थान स्मारकात रूपांतरित होईल. अध्यादेशाअंतर्गत मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पुराचि थलाइवी जे जयललिता मेमोरियल फाउंडेशनची (Puratchi Thalaivi Dr J Jayalalithaa Memorial Foundation) स्थापना केली जाईल. यामध्ये उपमुख्यमंत्री ओ.पी. पन्नेरसेल्वम व इतर लोक सदस्य म्हणून सामील असतील.

जयललिता यांच्या जंगम मालमत्तेत 4.37 किलो सोने, 601 किलो चांदी, 162 चांदीच्या वस्तू, 11 टीव्ही सेट्स, 10 फ्रिज, 38 वातानुकूलन, 556 फर्निचर वस्तू, 6514 स्वयंपाकघरातील भांडी, 1055 कटलरी आयटम, 221 स्वयंपाकघरातील विद्युत वस्तू, 251 विद्युत उपकरणे, 65 सुटकेस, 108 कॉस्मेटिक वस्तू, 8000 हून अधिक पुस्तके, 10 हजाराहून अधिक कपडे, मोबाइल फोनसह 29 टेलिफोन इत्यादींचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, अचल संपत्तीमध्ये दोन आंबे, एक कटाळ, पाच नारळ आणि पाच केळीची झाडे आहेत. जंगम मालमत्तेची एकूण संख्या 32,721 आहे. (हेही वाचा: नीरव मोदी याची 326.99 कोटी रुपयांची संपत्ती जप्त; मुंबई, अलीबागसह जैसलमेर येथील पवन चक्की, लंडन येथील फ्लॅटचाही समावेश)

अध्यादेश काढल्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने जे.डी. दीपक आणि जे.के. दीपा यांना मुख्यमंत्री जे. जयललिता यांचा द्वितीय श्रेणीचे कायदेशीर वारस म्हणून घोषित केले होते. याआधी 25 जुलै रोजी राज्य सरकारने 'वेद निलयम'चे अधिग्रहण करण्यासाठी शहर दिवाणी न्यायालयात 67.9 कोटी रुपये जमा केले होते. या रकमेपैकी आयकर आणि मालमत्ता कर थकबाकी म्हणून 36.9 कोटी रुपये देण्यात येतील. जयललिता यांना ही रक्कम आयकर विभागाला देणे होते.