Indian Citizenship: मागच्या वर्षी तब्बल 2.25 लाखांहून अधिक लोकांना सोडले भारतीय नागरिकत्व; 2011 पासून 16 लाखांहून अधिक जणांनी केला त्याग
पासपोर्ट (Image Credits: PTI)

केंद्र सरकारने अलीकडेच 9 राज्यांतील 31 जिल्हा दंडाधिकार्‍यांना नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) अंतर्गत पात्र पाकिस्तानी, अफगाण आणि बांगलादेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकार दिले आहेत. पण, भारतीय नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्यांची गुरुवारी (9 फेब्रुवारी) सरकारने संसदेत दिलेली आकडेवारी अतिशय धक्कादायक आहे. एका दशकाहून अधिक काळात, गेल्या वर्षभरात सर्वाधिक लोकांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला आहे आणि ते इतर देशांचे नागरिक बनले आहेत.

सरकारने 2011 ते 2022 पर्यंत भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संपूर्ण माहिती संसदेत उपलब्ध करून दिली आहे. केंद्र सरकारने सांगितले की, गेल्या 12 वर्षांत 16 लाखांहून अधिक लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतले आहे. यापैकी सर्वाधिक 2 लाख 25 हजार 620 लोकांनी गेल्या वर्षी आपले नागरिकत्व सोडले आहे. त्याच वेळी, 2020 मध्ये 85 हजार 256 लोकांनी सर्वात कमी नागरिकत्व सोडले आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की 2015 मध्ये 1 लाख 31 हजार 489 लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले होते. 2016 मध्ये 1 लाख 41 हजार 603 आणि 2017 मध्ये 1 लाख 33 हजार 49 जणांनी भारताचे नागरिकत्व सोडले होते. (हेही वाचा:  'नमाज अदा करण्यासाठी महिलांना मशिदीत प्रवेश करण्याची परवानगी आहे'; All India Muslim Personal Law Board ची सर्वोच्च न्यायालयात माहिती)

जयशंकर यांच्या मते, 2018 मध्ये 1 लाख 34 हजार 561, 2019 मध्ये 1 लाख 44 हजार 17, 2020 मध्ये 85 हजार 256 आणि 2021 मध्ये 1 लाख 63 हजार 370 लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले. 2022 मध्ये सर्वाधिक 2 लाख 25 हजार 620 लोकांनी नागरिकत्व सोडले. माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत पाच भारतीय नागरिकांनी यूएईचे नागरिकत्व मिळवले आहे. जयशंकर यांनी 135 देशांची यादी देखील दिली ज्यांचे नागरिकत्व भारतीयांनी घेतले आहे.