बिहारमध्ये 'चमकी' तापाचे थैमान; 20 दिवसांत 60 जणांचा मृत्यू, औषध शोधून काढण्यात डॉक्टर अपयशी
Children with encephalitis symptoms being treated at hospital in Muzaffarpur (Photo Credits: IANS)

संपूर्ण देशाचे लक्ष ‘वायू’ वादळाकडे (Vayu Cyclone) असताना बिहारमध्ये (Bihar) एका नव्या वादळाचा कहर उठला आहे. बिहारमध्ये चमकी तापाची साथ पसरली आहे. या तापामुळे आतापर्यंत तब्बल 60 जणांचा मृत्यू झाला असून, एकूण 154 जणांना या तापाची लागण झाली आहे. हिंदीमध्ये चमकी ताप म्हणा किंवा, इंग्रजीमध्ये अॅक्यूट इंसेफेलायटिस सिंड्रोम (Acute Encephalitis Syndrome) म्हणा, या दोन्हीचा एकच अर्थ आहे तो म्हणजे मृत्यू. सर्वात धक्कादायक म्हणजे अजूनपर्यंत या टपावर कोणतेही औषध उपलब्ध नाही। सध्या तरी काळजी घेणे हाच यावरील उपाय आहे.

बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, या तापामुळे 57 जणांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या मते या आजाराची सर्वात जास्त लागण सीतामढी, शिवहर, मोतिहारी, बेतिया आणि वैशाली या जिल्ह्यांमध्ये झाली आहे. या सर्व जिल्ह्यांमधील रुग्णालयांची स्थिती चांगली नसल्याने, त्यांना उपचारांसाठी मुजफ्फरपूरच्या रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे. या तापाने 2012 मध्ये सर्वात जास्त, म्हणजे 120 जणांचा मृत्यू झाला. 2013 मध्ये 39, 2014 मध्ये 90, 2015 मध्ये 11, पुढील वर्षी म्हणजेच 2016 साली 4, तर 2017 साली 11 जणांचा मृत्यू झाला. मागच्या वर्षी 7 मुले मरण पावली होती. (हेही वाचा: धक्कादायक! तीन मुलांसह गर्भवती महिलेची गळा चिरून हत्या; पोटातील बाळ वाचू नये म्हणून खुपसला चाकू)

10 जूनला फक्त एका दिवसात मुजफ्फरपूरच्या एसकेएमसीएचमध्ये या आजाराने ग्रस्त असलेली 44 मुले भरती केली गेली. या पैकी 25 मुलांचा मृत्यू झाला आहे. या तापाने पीडित असलेली आणि मृत्यू पावणारी सर्व मुले ही 5 ते 10 वर्षे वयोगटातील आहेत. एसकेएमसीएच सुपरिटेंडेंट सुनील शाही यांच्या मते 13 जून पर्यंत 137 बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, पैकी 50 मुले मरण पावले आहेत. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय टीम देखील मुजफ्फरपूर येथे पोहोचली आहे. दरम्यान दरवषी उन्हाळ्यात बिहार मधील याच भागात हा ताप आपले डोके वर काढत असतो. अजूनतरी या आजारावर कोणतेही औषध अथवा लस शोधून काढण्यात डॉक्टरांना अपयश आले आहे.