On This Day in 2019: रोहित शर्माने वर्ल्ड कप सामन्यात विक्रमी शतकासह बांग्लादेशला केले स्पर्धेतून आऊट, मोडला सौरव गांगुलीचा रेकॉर्ड
रोहित शर्मा (Photo Credit: Getty Images)

मुंबईचा 'हिटमॅन' रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) 2019 वनडे वर्ल्ड कप (World Cup) संस्मरणीय स्पर्धा ठरली. भारताला विश्वचषक जिंकण्यात यश मिळाले नाही पण वैयक्तिक रित्या रोहितने स्पर्धेत आपला सर्वोत्तम खेळ केला. रोहितचा अप्रतिम फॉर्म वर्ल्ड कपच्या 40 व्या सामन्यात देखील सुरूच राहिला जेव्हा बर्मिंघम येथे टीम इंडियाचा बांग्लादेशशी (Bangladesh) सामना झाला. बांग्लादेशवरील विजयासह टीम इंडियाने (Indian Team) विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली, तर बांग्ला टायगर्सला स्पर्धेच्या बाहेरचा रास्ता दाखवला. रोहितने या सामन्यात स्पर्धेतील चौथे शतक ठोकले आणि एका विश्वचषक स्पर्धेत चार शतके ठोकणारा रोहित पहिला भारतीय फलंदाज ठरला होता. यापूर्वी, एका वर्ल्ड कप स्पर्धेत शतकं ठोकण्याचा पराक्रम भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) केला. 2003 दक्षिण आफ्रिका येथील वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत गांगुलीने 3 शतकं ठोकली होती. रोहितने बांग्लादेशविरुद्ध शतकी खेळी करत 2019 च्या विश्वचषकात चौथ्या शतकांची नोंद केली आणि गांगुलीचा विक्रम मोडला. (ICC World Cup 2019: विजय शंकरचा खुलासा, पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड कप सामन्यापूर्वी  पाक चाहत्यांनी भारतीय खेळाडूंसाठी वापरले अपशब्द, जाणून घ्या 'तो' किस्सा)

रोहितने या शतकासह श्रीलंकेच्या कुमार संगाकाराशी बरोबरी केली होती. संगाकाराने ऑस्ट्रेलियामधील 2015 विश्वचषकमध्ये सर्वाधिक 4 शतकं ठोकण्याचा विक्रमी खेळ केला होता. सामन्यात भारताने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. दोघांमध्ये 180 धावांची भागीदारी झाली.  रोहितच्या 104, राहुल 77 आणि रिषभ पंतच्या 48 धावांच्या जोरावर भारताने बांग्लादेशसमोर विजयासाठी 315 धावांचे लक्ष्य ठेवले होते. रोहित आणि राहुल खेळपट्टीवर असताना भारत मोठी धावसंख्या उभारेल असे वाटले होते. पण, रोहित बाद झाल्यानंतर मोठी भागीदारी होऊ शकली नाही. मुस्ताफिझूर रहमानच्या बांग्लादेशकडून यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 10 ओव्हर 59 धावा देत भारताचा निम्मा संघ तंबूत पाठवला.

प्रत्युत्तरात बांग्लादेशचा संघ 286 धावच करू शकला. अनुभवी शाकिब अल हसनने दमदार अर्धशतक ठोकले. त्याने 66 धावा केल्या, पण त्याला इतर फलंदाजांनी साथ मिळाली नाही. खालच्या फळीतील सैफुद्दीनने नाबाद 51 धावांची खेळी करत सामना रंगतदार अवस्थेत नेला, पण बुमराहने 48 व्या ओव्हरच्या अखेरच्या दोन चेंडूंवर बांग्लादेशच्या दोन फलंदाजांना एकापाठोपाठ बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यासह भारताने 28 धावांनी विजय मिळवला आणि सेमीफायनल फेरीत प्रवेश केला. बुमराहने सर्वाधिक 4, पांड्याने 3 तर चहल, शमी आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी एक गडी बाद केला.