मुंबई सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना: 'तो पूल आमचा नव्हेच!'
Mumbai CSMT footover bridge Accident Photo (Photo Credits: ANI)

Mumbai CSMT footover bridge Accident: मुंबई सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना घडल्यानंतर नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा मुंबई रेल्वे प्रशासन (Railway Administration) आणि मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) यांच्यात पूल कोणाचा? यावरुन नाट्य रंगले आहे. घटनेची जबाबदारी स्वीकारण्यापेक्षा आरोप प्रत्यारोप आणि एकमेकांवर ढकलाढकली करण्यावरच दोन्हीकडील प्रशासनाचा भर दिसून येत आहे. हा पूल रेल्वे प्रशानचा आहे. या पूलाचे ऑडीट करण्याबातचे पत्र मुंबई महापालिकेने रेल्वे प्रशासनाला दिले होते, असा आरोप नगरेसवक, खासदार, आमदार आदी मंडळींनी रेल्वे प्रशासनावर केला. त्यानंतर हा पुल आमचा नव्हेच अशी भूमिका रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे हा पुल नेमका काणोचा? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार हा पुल रेल्वे प्रशासनाचा आहे. तर, त्याची देखभाल करण्याचे काम मुंबई महापालिकेचे आहे. या पुलाच्या देखभालीसाठी महापालिकेने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून एनओसी मिळाली नाही, असा आरोपही महाडेश्वर यांनी या वेळी केला.

स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी 'मुंबई महापालिकेने या पुलाचे ऑडीट व्हावे असे पत्र रेल्वे प्रशासनाला दिले होते. माझ्या आगोदर असलेले माजी नगरसेवक सानप यांनीही पुलाचे ऑडीट व्हावी अशी मागणी केली होती. मात्र, या पत्राची दखल रेल्वे प्रशासाने घेतली नाही. आम्ही या दुर्घटनेबाबत रेल्वे प्रशासनाला जाब विचारणार आहोत', असे सांगितले. तर, शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, मुंबई महापालिकेकडून रेल्वे प्रशासनाला पुलाच्या ऑडिटबाबत पत्र देण्यात आले होते. मला मिळालेल्या महितीनुसार, रेल्वे प्रशासनाने पुलाची पाहणी केली होती. या पुलाचे नाव धोकादायक पुलाच्या यादीत नव्हते. तसेच, या पुलाचे थोड्याफार प्रमाणात डागडुजी (मायनर रिपेरींग) करण्याची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले होते. या पुलाची डागडुजी करण्याची प्रक्रिया महापालिकेच्या नियमांनुसार सुरु होणार होती. त्यासाठी नजिकच्या काळात प्रस्ताव पास होणार होता. मात्र, त्यापूर्वीच ही घटना घडल्याचे सावंत यांनी सांगितले. (हेही वाचा, Photographs: मुंबई सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना छायाचित्रे)

हा पूल सुमारे दिडशे वर्षांपूर्वीचा आहे. मुंबईतील धोकादायक पूलांच्या यादीत या पूलाचा समावेश नव्हता. प्रशासनाने या पूलाची पाहाणी केली होती. मात्र, हा पूल धोकादायक स्थितीत नाही. त्याची थोड्याफार प्रमाणात डागडुजी करण्याची आवश्यकता आहे, असे ही पाहणी करणाऱ्या अभियंत्यांनी सांगितले होते. दरम्यान, अद्यापही हा पूल नेमका कोणाचा? मुंबई महापालिका की रेल्वे प्रशासनाचा याबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर होऊ शकला नाही.