ST Bus Accident | (Photo Cedit - X)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation) अर्थातच मरापम (MSRTC) प्रवाशांना सुखसोयी पुरविण्याच्या नावाखाली फक्त भाडेवाड करते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दररोज, या ना त्या कारणाने चर्चेत असलेले महामंडळ वज्रेश्वरी-वसई मार्गावर (Vasai Vajreshwari Road) एसटी बसला झालेल्या विचित्र अपघातामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. धक्कादायक असे की, हा अपघात (ST Bus Accident) केवळ कोणा व्यक्तीमुळे नव्हे तर महामंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे घडला आहे. जवळपास 30 किंवा त्याहून अधिक प्रवाशांना (Passenger) घेऊन रस्त्यावरुन धावत असलेल्या बसचे चाक चक्क अचानकच रस्त्यावर निखळून पडले. चालकाने प्रसंगावधान दाखवून बस नियंत्रीत केली म्हणून. अन्यथा, मोठा अनर्थ खडू शकला असता. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, सोशल मीडियावर फुटेज व्हायरल झाले आहे.

प्रताप सरनाईक यांचा आढावा केवळ कागदोपत्री?

राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एमएसआरटीसीचा कारभार हाती घेताच मोठ्या राणा भिमदेवी थाटात अधिकाऱ्यांकडून आढावा वैगैरे घेतला. यामध्ये पुढील 100 दिवसांमध्ये करावयाच्या बाबींवरही चर्चा झाली म्हणे. इतकेच नव्हे तर एसटीचे रुपडे पालण्याचे ठरवून आगामी काळात मोठे बदल करण्याच्या नावाखाली आणि दरवर्षी जवळपास 5000 नवीन बस खरेदीकरण्याचे राज्य सरकारचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र, अद्याप काहीही बदल झाले नाहीत. नागरिकांना त्याच पत्र्याच्या जुन्या बसने प्रवास करावा लागत आहे. या बस कधी रस्त्यात मध्येच बंद पडतात. कधी मर्यादित बससंख्या असल्याने मार्गावर बसच उपलब्ध नसते. तर कधी पुरेसे प्रशिक्षण नसलेल्या चालकांच्या हातात बस मिळाल्याने अपघाताच्या घटना घडतात. वज्रेश्वरी वसई मार्गावर घडलेली घटना तर संतापजनकच आहे. रस्त्यावरुन धावणाऱ्या बसचे चाक अचानक निखळले आहे. चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवत बस नियंत्रित केली म्हणून, पुढील अनर्थ टळला. अन्यथा, मोठी दुर्घटना घडू शकली असती. त्यामुळे मंत्री सरनाईक यांनी घेतलेला आढावा केवळ नावाला होता का? असे बोलले जात आहे.

एसटीचे चाक निघळताना

भाडेवाडीचा निर्णय पण बस कधी?

एसटी महामंडळाने अधिक सेवा-सूवीधा पुरविण्यासाठी रस्तेप्रवासादरम्यान भाडेवाड करण्याचा निर्णय घेतला. पण, हा निर्णय घेतला तरी त्यानुसार प्रवाशांना सेवासुवीधा केव्हा मिळणार, हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. रस्त्यावर अद्यापही त्याच जुन्या पुराने बस धावत आहेत. ज्या अतिशय कालबाह्य झाल्या आहेत. काही बस तर इतक्या जीर्ण-शिर्ण झाल्या आहेत की, त्या चक्क भंगार म्हणूनच ओळखल्या जात आहेत. केवळ इंजिन आणि चाके आहेत म्हणूनच त्या धावत आहेत. अनेक बसचा पत्रा गंजला आहे. काही बसमध्ये बसण्यासाठी आसनव्यवस्थाही निट नाही. इतकेच नव्हे तर काही बसला तर वरचे छप्परही ठिक नसून चालकाची खुर्ची देखील रस्शी अथवा इतर बाबींनी घट्ट बाधावी लागत आहे. अशा स्थितीतही चालक वाहक काम करत असल्याने आणि प्रवाशांना पुरेशी सेवा मिळत नसल्याने प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. महामंडळाने शक्य तितक्या लवकर नव्या बस खरेदी कराव्यात अशी मागणी जोर पकडत आहे.