मुंबईमधील कोरोना व्हायरस Peak कदाचित निघून गेला असेल; पण मान्सून, अनलॉकींग व संसर्गाचे नवे परिसर ही चिंता कायम- State Task Force प्रमुख डॉ. संजय ओक
A child wearing a mask to get protected from coronavirus. (Photo Credit: PTI)

राज्य सरकारचे नियुक्त केलेले टास्क फोर्सचे (Task Force) प्रमुख डॉ. संजय ओक (Dr Sanjay Oak) यांनी दिलेल्या माहितीनुसार, कदाचित मुंबई (Mumbai) मधील कोरोना विषाणूचा (Coronavirus) पीक (Peak) निघून गेला असावा आणि आता त्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मुंबईतील मृत्यूचे प्रमाण वेगाने वाढत असताना, टास्क फोर्सच्या प्रमुखपदी नेमण्यात आलेले डॉ. ओक म्हणाले की, नवीन प्रकरणांची संख्या, शहरातील डबलिंग रेट, रिकव्हरी रेट आणि मृत्यूचे प्रमाण हे गेल्या तीन आठवड्यांपासून समाधानकारक आहे. मेपेक्षा जून मध्ये परिस्थिती बरीच सुधारली असल्याचे ओक म्हणाले.

वरील नमूद केलेल्या गोष्टी जरी समाधानकारक असल्या तरी, राज्याच्या उंबरठ्यावर असलेला मॉन्सून, लॉक डाऊनच्या नियमांमधील शिथिलता व संसर्गाचे नवे परिसर ही चिंता अजूनही कायम असल्याचे मत डॉ.ओक यांनी व्यक्त केले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. केंद्र सरकारने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जवळपास 75,000 घटनांद्वारे मुंबईने शिखर गाठला होता. मात्र मेअखेरपर्यंत शहरात फक्त 39,444 प्रकरणांची नोंद झाली होती आणि सोमवारी, 22 जून रोजी एकूण रुग्णसंख्या 67,635 झाली.

मुंबईमधील कोरोनाचा पीक पाहता, टास्क फोर्सने जूनच्या पहिल्या आठवड्यात दिवसाला 3000 रुग्ण समोर येण्याचा अंदाज वर्तवला होता, मात्र सध्या रुग्णांची संख्या दीड हजाराच्या आत आहे. याचा अर्थ असा नाही की शहरावरील खतरा टळला आहे, पाउस आणि अनलॉकींगमुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या मुंबईच्या डबलिंग रेट 37 दिवस आहे, जो मे महिन्यात 13 दिवस होता.

आठवड्यातील रुग्ण वाढीचा दर - दर आठवड्याला दररोज समोर येणाऱ्या नवीन प्रकरणांची संख्या, मे मधील 5 टक्क्यांवरून घसरून सध्या 1.88 टक्के झाली आहे. ही संख्या अजून कमी येण्यामध्ये सातत्य ठेवले गेले आहे. 22 मे ते 27 मे दरम्यान हे प्रमाण 5 टक्के होते, ते 1 जून ते 8 जून दरम्यान 3 टक्क्यांवर घसरले पुढे 8 जून ते 14 जून या कालावधीत ते 3 टक्क्यांवर राहिले, त्यानंतर ते 9 जून ते 15 जून दरम्यान कमी होऊन 2.49 टक्क्यांवर गेले आणि 15 जून ते 21 जून या कालावधीत ते 1.88 टक्क्यांपर्यंत खाली गेले. (हेही वाचा: कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करणं हा एकमेव उपाय ठरू शकतो - देवेंद्र फडणवीस)

दरम्यान, टास्क फोर्सच्या म्हणण्यानुसार, सध्या जरी हे प्रमाण दिलासादायक असले तर, दुसरा पीक येण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही, त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.