शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भाजपवर अमित शाह यांच्या भाषेत टीका म्हणाले, 'शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांनाही पटकून टाका'
Shiv Sena party chief Uddhav Thackeray Slams Bjp on issue of Shiv Smarak | (Photo courtesy: archived, edited, representative image)

शिवस्मारकाच्या (Shiv Smarak ) मुद्द्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena party chief Uddhav Thackeray) यांनी भाजप (BJP) आणि सरकारवर भाजप पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्याच भाषेत टीका केली आहे. 'साथ आयेंगे तो जिता देंगे, नही आयेंगे तो पटक देंगे', असे विधान अमित शाह (Amit Shah) यांनी शिवसेनेचे नाव न घेता जाहीर सभेत काही दिसांपूर्वी केले होते. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मुखपत्र सामनातून त्याला प्रत्युत्तर दिले आहे. 'प्रश्न सीमाबांधवांच्या न्यायालयीन लढय़ाचा असो अथवा शिवस्मारकाच्या (Shivaji Maharaj Statue) कायदेशीर बाबींचा, सरकार नेमके इथेच का कमी पडत आहे? एरवी सरकार राजकीय निर्णय वेगाने घेते, पण इथे हलगर्जीपणाच आहे. भाजपला आडवे येतील त्यांना ‘पटकून’ टाकू अशी भाषा वापरणाऱ्यांचे राज्य महाराष्ट्रात आहे. मग शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांनाही पटकून टाका', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे.

' शिवस्मारकाचा छळ!' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा थांबवले आहे. हे वारंवार घडत आहे. शिवस्मारक उभारणीबाबत सरकार गंभीर आहे काय? हा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. गुजरातमध्ये नर्मदेच्या तीरावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा जागतिक उंचीचा पुतळा उभा राहिला. तेथे ना पर्यावरणाची समस्या निर्माण झाली ना कोणता तांत्रिक मुद्दा आडवा आला. केंद्राने सवर्णांना 10 टक्के आरक्षण खास घटना दुरुस्ती करून बहाल केले. मुस्लिम महिलांसाठी तिहेरी तलाकचा विषयही घटनेत बदल करून संपवला, पण अयोध्येत राममंदिर होत नाही व मुंबईच्या अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक होत नाही. तेथे न्यायालय आडवे येते की न्यायालयाची ढाल पुढे करून कोणी ही स्मारके होऊ देत नाही? शिवस्मारकाचे भूमिपूजन गुप्त पद्धतीने करण्याचा घाट मागे घातला गेला. मात्र त्यासाठी समुद्रात निघालेली बोटच खडकावर आपटून फुटली व बुडाली. त्यात एका निरपराध तरुणाचा नाहक बळी गेला. शिवस्मारकाच्या उभारणीत विघ्ने येत आहेत व सरकार त्यावर मूग गिळून बसले आहे. 3600 कोटी रुपयांचा हा भव्य प्रकल्प आहे, पण पहिल्या दिवसापासून सरकार या कार्याबाबत गंभीर नाही. (हेही वाचा, उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर अवघ्या 180 मनीटांमध्ये 'त्या' शेतकऱ्याला कर्जमाफी; प्रशासनाची सूत्रे हालली)

शिवस्मारकासंदर्भात पर्यावरणाच्या ज्या काही शंका काढल्या गेल्या आहेत त्यांचे निरसन सरकारला करावे लागणार आहे. शिवाय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे, त्याविषयीदेखील स्पष्टीकरण देण्याची जबाबदारीही सरकारचीच आहे. मात्र शिवस्मारकाची बाजू मांडण्यास सरकार कमी का पडत आहे? हा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. इतर सर्व राजकीय चढाओढीत राज्य सरकार कुठेच कमी पडत नाही. निवडणुकांत विजय विकत घेण्यापासून इतर सर्व व्यवहारांत सरकार कमी पडले नाही. पण प्रश्न सीमाबांधवांच्या न्यायालयीन लढय़ाचा असो अथवा शिवस्मारकाच्या कायदेशीर बाबींचा, सरकार नेमके इथेच का कमी पडत आहे? शिवस्मारकाच्या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या विनंतीवरून केंद्र सरकारने 2011 मध्ये सीआरझेड नियमावलीत दुरुस्ती केली. (तेव्हा भाजपचे राज्य नव्हते.) या दुरुस्तीला ‘द कन्झर्वेशन ऍक्शन ट्रस्ट’ने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. तेव्हापासून ही याचिका शिवस्मारकास छळत आहे. एरवी सरकार राजकीय निर्णय वेगाने घेते, पण इथे हलगर्जीपणाच आहे. भाजपला आडवे येतील त्यांना ‘पटकून’ टाकू अशी भाषा वापरणाऱ्यांचे राज्य महाराष्ट्रात आहे. मग शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांनाही पटकून टाका, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.