Navratri 2021 Guidelines: यंदा नवरात्रीमध्ये गरबा व दांडियाचे आयोजन नाही, 4 फुटांची असेल मंडळातील देवीची मूर्ती; BMC ने जारी केल्या मार्गदर्शक सुचना
Navratri 2021 (Photo Credits: Pixabay and Wikimedia Commons)

देशात गणपतीनंतर नवरात्रोत्सवाची (Navratri 2021) धूम सुरु आहे. मात्र अजूनही देशावर कोरोनाचे सावट असल्याने आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) गुरुवारी (30 सप्टेंबर, 2021) हा उत्सव साजरा करण्याबाबत नागरिकांसाठी नवीन मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. कोविड-19 आणि डेंग्यूच्या प्रसाराच्या वाढत्या भीती दरम्यान हा निर्णय घेण्यात आला. शासनाने ऑनलाईन दर्शनावर भर द्यावा असे सांगितले आहे. परंतु कोविड-19 सुरक्षा प्रोटोकॉल लक्षात घेऊन मंडळामध्ये देवीचे दर्शन दिले जाईल. नियमांचा भंग केल्यास अशा व्यक्तींविरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

मार्गदर्शक सुचना-

  • सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी नवरात्रोत्सव मंडळांना बृहन्मुंबई म.न.पा.ची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल.
  • कोविड-19 या साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता मर्यादित आकारमानाचेच मंडप उभारण्यात यावेत.
  • यावर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिकरित्या स्थापन करण्यात येणा-या देवीमूर्तीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.
  • देवींची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट व घरगुती मूर्तीकरिता 2 फूटांपेक्षा जास्त उंचीची नसावी.
  • यावर्षी शक्यतो पारंपारिक देवीमूर्तीऐवजी घरातील धातू/ संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे.
  • मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे.

     

  • घरगुती देवीमुर्तीचे आगमन-विसर्जन मिरवणूकीच्या स्वरूपाचे नसावे. आगमनासाठी

    जास्तीत जास्त 5 व्यक्तींचा समूह असावा. जे उपस्थित असतील ते मास्क / शिल्ड इ. स्वसंरक्षणाची साधने काटेकोररित्या वापरावीत आणि सामाजिक अंतर पाळावे.

  • सार्वजनिक देवीमूर्तीच्या आगमनाच्यावेळी व विसर्जनाच्यावेळी 10 पेक्षा अधिक लोक असणार नाहीत.
  • नवरात्रौत्सवादरम्यान गरव्याचे आयोजन केले जावू नये. तसेच, आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी.
  • शक्यतो देवीमूर्तीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे, उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
  • मंडपाच्या मुख्य भागांचे दिवसांतून तीन वेळा निर्जंतुकीकरण (Sanitisation) करावे,
  • कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रसाद वाटणे / फूले व हार अर्पण करणे इ. बाबींस शक्यतो आळा घालावा. (हेही वाचा: राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती)
  • नवरात्रौत्सव मंडपाच्या परिसरात तसेच त्या लगतच्या रस्त्यांवर फुले, हार, प्रसाद इ. विक्रीसाठी स्टॉल | दुकाने इ. लावू नयेत. कोराना विषाणूच्या गंभीर आपत्ती लक्षात घेता गर्दी होवू नये म्हणून मंडप सजावट-रोषणाई-देखावे करु नयेत.
  • मंडपात एका वेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित राहू नयेत याची खबरदारी घ्यावी.