Pankaja Munde यांच्या पराभवाची कारणे नेमकी काय... वाचा सविस्तर
पंकजा मुंडे (फोटो सौजन्य-फेसबुक)

काल लागलेले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल फारच अनेपक्षित होते असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण भाजपसाठी कालचा निकाल फारच धक्कादायक होता. एक्सिट पोलने दर्शवल्यानुसार भाजप आणि शिवसेना महायुती 200 पार जाऊ शकणार होती. परंतु 200 जाणं तर दूरच, भाजपचे अनेक मंत्री देखील कालच्या निवडणुकीत पराभव झाले आहेत.

परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे भाजपच्या उमेदवार होत्या. त्यांची लढत त्याचाच भाऊ धनंजय मुंडे यांच्याशी होती. परंतु जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असण्याचा दावा करणाऱ्या पंकजा यांना पराभवाचा धक्का पत्करावा लागला आहे.

काय असू शकतात पंकजा मुंडे यांच्या पराभवाची कारणे?

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, "पंकजा मुंडे यांचं सार्वजनिक व्यवहारातलं वर्तन सामान्य जनतेला आवडेललं नाही. पंकजा मुंडेंचा अहंकार, तसंच इमोशनल ड्रामाही परळीच्या जनतेला पसंत पडलेला दिसत नाही. खरं तर नमिता मुंदडा यांच्या भाजप प्रवेशामुळे पंकजा मुंडे विजयी व्हायला पाहिजे होत्या, पण तसंही झालं नाही."

इतकंच नाही तर चोरमारे सांगतात, "याशिवाय मतदानाच्या दोन दिवस अगोदर परळीत जो ड्रामा झाला, तो म्हणजे धनंजय मुंडेंना अडचणीत आणण्यासाठीचं कारस्थान आहे, अशी लोकांची समजूत झाली."

लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांनी देखील पंकजा मुंडेंच्या पराभवाविषयी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, "अँटी-इन्कम्बन्सी हे एक कारण पंकजा मुंडे यांच्या पराभवामागे आहे. पण भावा-बहिणीच्या वादाचा परळीतल्या जनतेला उबग आल्याचंही हे निकाल दाखवतात. खरं तर नेत्यांनी जनतेला गृहीत धरायला नको. पण, आपण विजयी होणारच असा भाजपच्या काही नेत्यांचा समज झाला होता. पण, परळीतल्या जनतेनं मात्र उमेदावाराच्या स्थानिक कामकाजाचं मूल्यमापन करून मतदान केलं आहे."

बारामती: गोपीचंद पडळकर यांच्या पराभवाची प्रमुख कारणे

तर लोकसत्ताच्या औरंगाबाद आवृत्तीचे प्रतिनिधी सुहास सरदेशमुख सांगतात, "पंकजा मुंडेंचं सामान्य माणसाला व्यवस्थित अटेंड न करणं, त्यांच्या पराभवामागचा मुद्दा आहे."