अजित पवार यांनी वस्त्रहरण थांबवले, पण भाजपा पुरती नागडी झाली; मस्तवाल हैदोस थांबला, आता सर्व शुभ घडेल: शिवसेना
Uddhav Thackeray | (Photo Credit: File Photo)

Government Formation Maharashtra: बहुमत चाचणीला सामोरे न जाताच फडणवीसांचे सरकार पळून गेले. इतकी नाचक्की महाराष्ट्रात कोणत्याच सरकारची व राजकीय पक्षाची झाली नव्हती. अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेवटच्या टप्प्यात आपले वस्त्रहरण थांबवले, पण भाजपा पुरती नागडी झाली. महाराष्ट्रातील एक मस्तवाल हैदोस थांबला. आता शुभ घडेल, अशा तीव्र शब्दांत शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेचे मुखपत्र अशी ओळख असलेल्या दै. सामना संपादकीयातून (Saamana Editorial) भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी औटघटकेच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि राज्यातील भाजपा (BJP) सरकार संपुष्टात आले. फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस (Shiv Sena, Nationalist Congress, Congress) या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीने राज्यात सत्तास्थापनेचा दावा केला. महाविकास आघाडी उद्या (28 नोव्हेंबर 2019) सत्तेवर येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करत मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. दरम्यान, सामनातील आजच्या संपादकीयानंतर शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP) हा संघर्ष संपुष्टात येणार की शिवसेना सत्तेत आल्यानंतरही हा 'सामना' (Saamana) असाच सुरु राहणार याबाबत उत्सुकता आहे.

काय म्हटले आहे सामना संपादकीयात? 'जसेच्या तसे'

सगळ्यांच्या वल्गना हवेतच विरल्या. शेवटी देवेंद्र फडणवीसांचे औटघटकेचे राज्य विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाताच कोसळले. ज्यांच्या पाठिंब्यावर फडणवीस यांनी सरकार स्थापनेचा दावा केला त्या अजित पवार यांनी सगळय़ात आधी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व अजित पवारांच्या पाठीशी दोन आमदारही उरले नाहीत हे पक्के झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनाही जावे लागले. भ्रष्ट आणि बेकायदा मार्गाने महाराष्ट्राच्या बोकांडी बसलेले सरकार फक्त 72 तासांत गेले, असं म्हणत शिवसेनेने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राजीनामा सत्रानंतर शिवसेनेने सामनामधून पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. बहुमताचा आकडा नसतानाही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली हा गुन्हा असून ज्यांच्या पाठिंब्यावर शपथ घेतली त्या अजित पवारांवरील भ्रष्टाचाराचे सर्व गुन्हे चार तासांत मागे घेतले, हा दुसरा गुन्हा. या गुन्ह्यांसाठी जागा निवडली मुंबईच्या राजभवनाची. जथे संविधानाचे रक्षण व्हावे त्या संविधानाच्या संरक्षकानीच या गुन्ह्यांस कवच दिले. त्यामुळे आज ज्यांनी संविधान दिवस साजरा करण्याचे ढोंग केले त्यांनाही सर्वोच्च न्यायालयाने चपराक मारली आहे. महाआघाडीच्या 162 आमदारांनी देशाच्या जनतेसमोर येऊन एकजुटीचे प्रदर्शन केले. भारतीय जनता पक्षाच्या बहुमताच्या दाव्यची हवाच त्यामुळे निघाली. (हेही वाचा, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे होणार महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री; जाणून घ्या 'मातोश्री' ते 'वर्षा'पर्यंतचा त्यांचा प्रवास)

सभागृहाबाहेर हा बहुमताने केलेला पराभव होता. आम्ही आमदार फोडू व बहुमत दाखवू या विकृतीसही सर्वोच्च न्यायालयाने वेसण घातली. बहुमत चाचणी गुप्त मतदानाने नको, तर त्याचे लाइव्ह प्रक्षेपण करा, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे ‘ई.डी., इन्कम टॅक्स’ वगैरे भाजपचे कार्यकर्ते काय करणार? संविधान दिवसाच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल यावा आणि थैलीशाहीचे आणि दमनशाहीचे राजकारण करू पाहणाऱ्यांना दणका बसावा हादेखील एक चांगला योगायोगच म्हणावा लागेल. सत्ताधाऱ्यांनी जरी लोकशाही मूल्यांचा आणि तत्त्वांचा बाजार मांडला असला तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तो उधळला गेला. पैशांच्या बॅगा घेऊन एजंट आमदारांच्या पाठी फिरत होते. बहुमत विकत घेऊन राज्य करण्याचा हा प्रयत्न केविलवाणा ठरला. लोकशाही मूल्यांचे रक्षण झाले पाहिजे. लोकांना चांगले सरकार मिळविण्याचा अधिकार आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले. त्या मताचा शेवटी नाइलाजाने का होईना आदर करावा लागला. भारतीय जनता पक्षाशी आमचे वैयक्तिक भांडण असण्याचे कारण नाही. पण जाता जाता फडणवीसांनी आमच्यावर दोषारोप केले आहेत. शिवसेना सत्तेची लाचार असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. हे सांगणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणाव्या लागतील.

शिवसेनेला सत्तेची लाचार म्हणणाऱयांनी स्वतःच्या अंतरंगातील जळमटे आधी पाहावीत. अजित पवारांशी त्यांनी ‘पाट’ लावलेला चालतो, पण शिवसेनेस जे द्यायचे ठरले होते त्यावर पलटी मारून काय मिळवले? सत्तेची लाचारी नसती व दिलेल्या शब्दास जागण्याची इच्छा असती तर ही वेळ भाजपवर आली नसती. तुम्ही खोटे बोललात व शिवसेनेला खोटे पाडण्याचा प्रयत्न केलात. त्यामुळे महाराष्ट्राचे स्थैर्य व स्वाभिमान यासाठी आम्ही तीन पक्षांनी एकत्र यायचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी वगैरे २०१४ साली राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपाने घेतला होता तेव्हा ती लाचारी नव्हती. मग आता लाचारी कसली? भाजपाचे वैफल्य असे आहे की इतर राज्यांत जे करू शकले ते त्यांना महाराष्ट्रात घडवता आले नाही. महाराष्ट्राने दबाव झुगारला व आमदारांनी स्वाभिमान राखला. महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी. येथे स्वाभिमानाचा ज्वालामुखी सदैव उसळत असतो. या स्वाभिमानाला डिवचण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा झाला तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने पाणी दाखवले. महाराष्ट्रात भाजपने सत्तेसाठी इतके अगतिक का व्हावे? इतके अनैतिक व तत्त्वशून्य वागण्याची वेळ त्यांच्यावर यावी हे दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांच्या आजच्या वारसदारांचे दुर्दैव! अजित पवार यांनी शेवटच्या टप्प्यात आपले वस्त्रहरण थांबवले, पण भाजपा पुरती नागडी झाली. महाराष्ट्रातील एक मस्तवाल हैदोस थांबला. आता सर्व शुभ घडेल!