Cyclone in Mumbai: समुद्रात सुरु झाली खळबळ; मुंबईला पुन्हा चक्रीवादळाचा धोका, जाणून घ्या सविस्तर
चक्रीवादळ (Photo Credits- IMD)

मुंबईवर (Mumbai) पुन्हा एकदा चक्रीवादळाचे (Cyclone) संकट घिरट्या घालत आहे. समुद्रात प्रचंड वादळ येण्यापूर्वी जी लक्षणे दिसतात ती मुंबईत दिसून येत आहेत. समुद्राखालील हालचाली वाढल्या आहेत. तापमान वाढू लागले आहे तसेच पाण्याची पातळीदेखील वाढत आहे. हे तापमान असेच वाढत राहिल्यास समुद्रात भीषण वादळ येण्याची शक्यता आहे. एका अहवालात ही बाब समोर आली आहे. पाण्याची पातळी अशीच वाढत राहिल्यास 2050 पर्यंत या वाढत्या जलपातळीमुळे सुमारे 5 हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.

हवामान बदलावरील आंतर-सरकारी पॅनेलच्या सहाव्या मूल्यमापन अहवालाचा दुसरा भाग समोर आला आहे. या अहवालानुसार, मुंबईच्या समुद्रात असे बदल 2027 पर्यंत 2.9 वेगाने वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. कोस्टल रोडला पुरापासून वाचवण्यासाठी आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्यापासून वाचवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सुरक्षेसाठी प्रयत्न आणि आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.

जसजसा काळ जाईल तसतसे सर्वप्रथम किनारपट्टी भागातील प्राणी, वनस्पती, मासे यांच्यावर संकट उभे राहण्याची भीती आहे. यानंतर मुंबईसह संपूर्ण जगात वाढत्या तापमानामुळे मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतरच्या काळात चक्रीवादळात वाढ होणार आहे. यामुळे मोठा विध्वंस सुरू होईल. लवकरच मुंबई चक्रीवादळाचा प्रभाव दिसू लागेल. हे फक्त मुंबईतच होणार नाही. मुंबईसह कोलकाता, चेन्नईसारख्या शहरांमध्ये समुद्राची पातळी वाढल्याने संकट वाढणार आहे.

अशा परिस्थितीत उत्सर्जन कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. जर उत्सर्जनात घट झाली नाही, तर उष्णता आणि आर्द्रता एकत्र येऊन जगभरात अशी परिस्थिती निर्माण होईल, जी सहन करणे मानवाच्या नियंत्रणात राहणार नाही. ज्या देशांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होणार आहे, त्यात भारतही एक आहे.

ही परिस्थिती टाळण्यासाठी काँक्रीटच्या जंगलाला पुन्हा हिरवेगार जंगल बनवावे लागेल. अधिकाधिक झाडे लावावी लागतील. हरित पायाभूत सुविधांशी संबंधित सुविधा वाढवाव्या लागतील. जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी पावले उचलली लागतील आणि नद्यांच्या संवर्धनाकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. तापमान असेच वाढत राहिल्यास लवकरच असे वातावरण निर्माण होईल जिथे, कितीही निरोगी असला तरीही मानव सहा तासांहून अधिक काळ नीट जगू शकणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.