पेरु खल्ल्याने निपाह आजाराची लागण? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक केरळ राज्यात रवाना; रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याला
Nipah virus (Photo Credits: File Image, Tom Ingebertsen, parkjisun)

रुग्णाने दिलेल्या माहितीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डॉक्टरांचे एक पथक केरळ (Kerala) राज्यात पाठवले आहे. डॉक्टरांचे हे पथक पेरु (Guava) या फळाचे सेवन केल्यामुळेच रुग्णाला निपाह (Nipah) आजाराची लागण झाली का? याचा तपास करणार आहे. निपाह आजाराची लागण झालेल्या एका रुग्णाने आपण दोन आठवड्यांपूर्वी पेरु हे फळ खाल्ले होते. त्यातूनच आपल्याला निपाह रोगाची लागण झाली असावी, असे उपचारादरम्यान सांगितले होते. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डॉक्टरांचे पथक पाचारण केले आहे.

दरम्यान, ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने याबाबत वृत्त दिले आहे. एम्सचे डॉ. आशुतोष विश्वास यांच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तात म्हटले आहे की, निपाह आजाराचे निदान झालेल्या रुग्णाने दोन आठवड्यांपूर्वी पेरु हे फळ खाल्ले होते. फळांवर वटवाघळे निपाह विषाणूचे कॅरिअर असतात. त्यामुळे त्यांच्या लाळेतून रुग्णांना निपाहची बाधा होऊ शकतात. रुग्णाकडून प्राप्त झालेल्या निपाहबद्दलच्या नव्या माहितीबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना आम्ही माहिती दिली आहे. तसेच, या नव्या माहितीच्या आधारे काही उकल होऊ शकते का ते तपासण्यासही सांगण्यात आले आहे.

देशात निपाह व्हायरसचा धोका पुन्हा एकदा वाढला आहे. तामिळनाडू जिल्ह्यातील एका रुग्णाला अती प्रमाणात ताप आल्याने पुड्डुचेरी येथील जेआईपीएमईआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला निपाह विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. सध्या त्याला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.

स्थानिक आरोग्य अधिकाऱ्याने म्हटले आहे की, रुग्णाच्या रक्ताच्या नमुने NIV पुणे येथे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल आज (बुधवार) मिळण्याची शक्यता आहे.