Severely Acute Malnourished: भारतामधील 9.2 लाखाहून अधिक मुले तीव्र कुपोषित; उत्तर प्रदेश व बिहारमध्ये सर्वाधिक कुपोषण, जाणून घ्या महाराष्ट्राची स्थिती
एचएक्यू सेंटर फॉर चाईल्ड राईट्सचे सह-संस्थापक एनाक्षी गांगुली यांनी पीटीआयला सांगितले की, 'बेरोजगारी वाढली आहे, आर्थिक संकट वाढले आहे. याचा उपासमारीवर परिणाम होतो, परिणामी कुपोषण वाढते. सरकारकडे स्पष्ट प्रोटोकॉल आहे आणि त्यांना त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे
भारतातील 9.2 लाखाहून अधिक मुले तीव्र कुपोषित (Severely Acute Malnourished) असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये सर्वात जास्त उत्तर प्रदेशातील मुले कुपोषित आहेत. यानंतर कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक असलेले राज्य बिहार आहे. एका माहिती अधिकारांना उत्तर म्हणून केंद्र सरकारने ही माहिती दिली आहे. याबाबत चिंता व्यक्त केली गेली आहे की, कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे दारिद्र्यरेषेखालील लोकांमध्ये आरोग्याचे संकट वाढू शकते. महिला व बाल विकास मंत्रालयाने पीटीआयच्या वृत्तसंस्थेच्या आरटीआईला उत्तर देताना म्हटले की, गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत देशभरात सहा महिन्यांपासून सहा वर्षांपर्यंतच्या अंदाजे 9,27,606 कुपोषित बालकांची ओळख पटली आहे.
शेअर केलेल्या आकडेवारीनुसार यातील 3,98,359 मुले उत्तर प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये 2,79,427 कुपोषित मुले आहेत. लडाख, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर आणि मध्य प्रदेशात तीव्र कुपोषित मुलांची नोंद झालेली नाही. कुपोषित मुलांचे वजन उंचीपेक्षा कमी असते आणि कमी रोगप्रतिकारक शक्तीमुळे, होणा-या आजारांमुळे त्यांचे मृत्यूचे प्रमाण नऊ पट अधिक असते.
महिला व बालविकास मंत्रालयाने गेल्या वर्षी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कुपोषित मुलांची ओळख पटवण्यास सांगितले होते, जेणेकरुन त्यांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करता येईल. त्यानंतर 9,27,606 आकडा समोर आला आहे. पुढे हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे कारण कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांना प्रभावित करेल अशी शंका आहे.
एचएक्यू सेंटर फॉर चाईल्ड राईट्सचे सह-संस्थापक एनाक्षी गांगुली यांनी पीटीआयला सांगितले की, 'बेरोजगारी वाढली आहे, आर्थिक संकट वाढले आहे. याचा उपासमारीवर परिणाम होतो, परिणामी कुपोषण वाढते. सरकारकडे स्पष्ट प्रोटोकॉल आहे आणि त्यांना त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. त्यात सुधारणा करण्यात अंगणवाडी केंद्रांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.' (हेही वाचा: Coronavirus New Variant: भारतात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट, 7 दिवसातच होते शरीरातील वजन कमी)
गंभीर कुपोषित मुलांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील तिसर्या क्रमांकावर आहे. येथे 70,665 मुले कुपोषित आहेत. त्यानंतर गुजरातमध्ये 45,749, छत्तीसगडमध्ये 37,249, ओडिशामध्ये 15,595, तमिळनाडुमध्ये 12,489, झारखंडमध्ये 12,059, आंध्र प्रदेशात 11,201, तेलंगानामध्ये 9,045, असममध्ये 7,218, कर्नाटक 6,899, केरळ 6,188 आणि राजस्थानमध्ये 5,732 बालके गंभीर कुपोषित आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2021 04:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

