Disasters in Uttarakhand: निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेले 'उत्तराखंड' 1991 ते 2013 दरम्यान 6 वेळा हादरले होते; ओढवल्या होत्या अनेक नैसर्गिक आपत्ती, जाणून घ्या सविस्तर 

जून 2013 मध्ये, उत्तर भारतामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पूर आणि भूस्खलन झाले. यामुळे हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश ही इतर राज्येही बाधित झाली. पुरामुळे जीवित व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Disasters in Uttarakhand: निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेले 'उत्तराखंड' 1991 ते 2013 दरम्यान 6 वेळा हादरले होते; ओढवल्या होत्या अनेक नैसर्गिक आपत्ती, जाणून घ्या सविस्तर 
Uttarakhand glacier burst in Chamoli (Photo Credits: ANI)

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) आज घडलेल्या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशाचे लक्ष या राज्याकडे लागले आहे. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हिमनदी फुटल्याने रविवारी नद्यांना पूर आला. या दुर्घटनेमध्ये 100-150 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या युद्धपातळीवर इथे बचावकार्य सुरु आहे. संपूर्ण देश उत्तराखंडसाठी प्रार्थना करीत असताना, याआधी इथे घडलेल्या 2013 सालच्या केदारनाथ आपत्तीच्या भयानक आठवणी जाग्या झाल्या आहेत. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे आज त्यावेळीसारखा पाऊस पडत नव्हता. आकाश पूर्णपणे स्वच्छ होते, ज्यामुळे हेलिकॉप्टरसह मदतकार्य सुरु आहे.

उत्तराखंड येथे निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण झाली आहे. मात्र दुसरीकडे नैसर्गिक आपत्तींची भीतीही या राज्याला तितकीच आहे. याधीही इथे अनेक नैसर्गिक आपत्ती ओढवल्या होत्या, आजच्या लेखात आपण अशाच काहींची माहिती घेणार आहोत.

1991 उत्तरकाशीचा भूकंप (1991 Uttarkashi Earthquake): 20 ऑक्टोबर 1991 मध्ये अविभाजित उत्तर प्रदेशात 6.8 तीव्रतेचा भूकंप झाला होता. या आपत्तीत कमीतकमी 768 लोक मारले गेले होते आणि हजारो घरे नष्ट झाली होती. या धक्क्याने 1,294 खेड्यांमधील 300,000 लोक प्रभावित झाले होते. 7,500 घरांचे नुकसान झाले होते तर 7,500 घरे नष्ट झाली होती.

1996 हरिद्वार आणि उज्जैन चेंगराचेंगरी (1996 Haridwar and Ujjain Stampedes): 15 जुलै 1996 पवित्र हरिद्वार आणि उज्जैन या दोन शहरांमध्ये झालेल्या मानवी चेंगराचेंगरीमध्ये अनुक्रमे 21 आणि 39 लोक ठार झाले होते. यासह अनुक्रमे 40 आणि 35 लोक जखमी झाले होते.

1998 माल्पा भूस्खलन (1998 Malpa Landslide): 18 ऑगस्ट 1998 रोजी झालेले माल्पा भूस्खलन हे भारतीय इतिहासामधील सर्वात भयानक भूस्खलनापैकी एक समजले जाते. पिथोरगढ जिल्ह्यातील छोटे गाव मालपा हे दरड कोसळल्यामुळे नष्ट झाले. या अपघातात 55 कैलास मानसरोवर भाविकांसह सुमारे 221 जण ठार झाले. दरड कोसळून साचलेल्या चिखलामुळे शारदा नदी विस्कळीत झाली होती. याच अपघातामध्ये भारतीय नर्तिका प्रोतिमा बेदी यांचेही निधन झाले होते.

1999 चामोली भूकंप (1999 Chamoli Earthquake): 29 मार्च 1999 रोजी चमोली जिल्ह्यात 6.8 तीव्रतेच्या भूकंपात 100 पेक्षा जास्त लोक ठार झाले होते. हा भूकंप हिमालयातील तटाजवळील 90 वर्षातील सर्वात शक्तिशाली भूकंप होता.

2012 हिमालयीन पूर (2012 Himalayan Flash Floods): हिमालयी प्रदेशात 3 ऑगस्ट 2012 च्या मध्यरात्री पूर आला होता. अचानक झालेल्या ढगफुटीमुळे भूस्खलन आणि फ्लॅश पूर आले. त्यामुळे 31 लोक ठार तर 40 बेपत्ता असल्याची नोंद आहे. (हेही वाचा: उत्तराखंड येथे ग्लेशियर फुटल्यानंतर 100 ते 150 लोक वाहून गेल्याची भीती, 9 ते 10 मृतदेह सापडले; PM Narendra Modi म्हणाले- 'संपूर्ण देशाची प्रार्थना राज्यासोबत आहे')

2013 महापूर (2013 North India Floods): जून 2013 मध्ये, उत्तर भारतामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पूर आणि भूस्खलन झाले. यामुळे हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश ही इतर राज्येही बाधित झाली. पुरामुळे जीवित व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुष्कळ लोक पूरात बुडून गेले आणि हजारो लोक बेघर झाले. 24 जून 2013 पर्यंत या भीषण आपत्तीत 5000 हून अधिक लोक मरण पावले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Feb 07, 2021 08:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).