1 मे पासून सार्वजनिक सेवा क्षेत्रात मोठे बदल, जाणून घ्या 5 नवे नियम
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

महाराष्ट्र दिनाचे (Mahrashtra Day) औचित्य साधून भारतातील काही सार्वजनिक संस्थांच्या कामकाजात महत्व पूर्ण बदल करण्यात येतील. प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, एसबीआय (SBI), पीएनबी (Punjab National Bank) , भारतीय रेल्वे (Indian Railway) , एअर इंडिया (AIR India) या संस्थांनी आपल्या उपभोक्त्यांसाठी नवीन नियमावली तयार केली असून आज, 1 मे पासून हे नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. हे नियम नेमके काय असतील याविषयी जाणून घेऊयात..

1) एसबीआयच्या व्याजदरात बदल

स्टेट बँक ऑफ इंडिया ने कमी वेळासाठी दिलेल्या कर्जाच्या आणि बचत खात्याच्या व्याजदराच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 लाखापेक्षा जास्त शिल्लक असलेली बचत खाती, तसेच थोड्या कालावधीसाठी दिलेल्या कर्जावरील व्याजदर स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आरबीआयच्या रेपो रेटसोबत जोडले आहेत. यानुसार एक लाख पर्यंत बचत असणाऱ्यांना 3.50% इतका व्याजदर तसेच एक लाखाहून अधिक बचत असणाऱ्यांना 3.25% इतकं व्याजदर बॅंकेटरफर पुरवण्यात येईल. या शिवाय कर्जदारांना दिलासा मिळेल असेही नियम तयार करण्यात आले आहेत.

2) एक्सप्रेस गाड्यांचे बोर्डिंग स्टेशन 4 तास अगोदर बदलता येणार

भारतीय रेल्वेच्या नियमावलीत देखील काही बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी ज्या स्थानकावरून गाडी पकडायची असेल त्यात बदल करायचा असल्यास 24 तास आधी पर्यंतच करता येत होता, या नियमात फेरबदल करून आता चार तास आधी पर्यंत देखील बोर्डिंग स्टेशन बदलता येणार आहे.

3) एअर इंडियाचे तिकीट विनाशुल्क रद्द करता येणार

1 मे पासून एयर इंडियाचे तिकीट बुकिंग केल्यावर पुढील 24 तासात रद्द करायचे झाल्यास त्यासाठे कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र यासाठी तिकीटाची तारीख सात दिवस नंतरची असावी अशी अट ठेवण्यात आली आहे. यासोबतच नवीन ठिकाणे जोडणारी विमानसेवा देखील चालू होणार आहेत.

4)आधार कार्ड शिवाय मिळणार मोबाईलचे सीमकार्ड

झी न्यूजच्या वृत्तानुसार, मोबाईलचे सिम कार्ड घेण्यासाठी या पुढे आधार कार्डची गरज लागणार नाही.अनेक टेलिकॉम कंपन्यांनी एका डिजिटल सिस्टीमची निर्मिती केली आहे. ज्यात ग्राहकांना आपली माहिती टाकून सिमकार्ड मिळवता येईल.

5) ई वॉलेट होणार बंद

पंजाब नॅशनल बॅंकेने आपले ई-वॉलेट 'पीएनबी किटी' बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅंकेने सर्व ग्राहकांना 30  एप्रिलपर्यंत वॉलेटमधली रक्कम अकाउंटमध्ये टाकण्यास अथवा खर्च करण्यास सांगितले होते.

आज पासून अंमलबजावणीत आलेल्या या निर्णयांना सामान्य जनता कशा प्रकारे स्वीकारेल आणि याचा नेमका काय परिणाम होईल हे बघण्यासारखे आहे