Ranji Trophy 2019-20: वसीम जाफर याने रचला इतिहास, रणजी ट्रॉफीमध्ये 150 सामने खेळणारा बनला पहिला खेळाडू
वसीम जाफर (Photo Credits: Getty Images)

अनुभवी फलंदाज वसीम जाफर (Wasim Jaffer) सोमवारी 150 रणजी सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू ठरला. सोमवारी आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) विरुद्ध सामन्यात मैदानात उतरताना वसीमच्या नावावर या विक्रमाची नोंद झाली. वसीमऐवजी देवेंद्र बुंदेला (Devendra Bundela) याने 145 सामने खेळले तर माजी अनुभवी अमोल मजूमदार (Amol Muzumdar) यांनी 136 रणजी सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. 1996/97 च्या रणजी हंगामातून वसीमने रणजीमध्ये पदार्पण केले. त्याने घरगुती क्रिकेट कारकीर्दीत आजवर अनेक विक्रम मोडले आणि निर्मित केले आहे. त्याने रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) मध्ये आजवर 40 शतकं ठोकली आहेत. याखेरीज वर्ष 2018 मध्ये तो या स्पर्धेत 11 हजार धावा करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला. 41 वर्षीय या माजी भारतीय सलामी फलंदाजाला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 20,000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 853 धावांची गरज आहे. जाफरने एकूण 253 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यात 19,147 धावा फटकावल्या आहेत. (Ranji Trophy 2019-20: विजय शंकर याची तमिळनाडूच्या कर्णधारपदी नियुक्ती, सूर्यकुमार यादव करणार मुंबईचे नेतृत्व)

आंध्रविरुद्ध मॅचमध्ये त्याला पहिल्या दिवशी फलंदाजीची संधी मिळाली नाही. कर्णधार हनुमा विहारीच्या 83 धावा करूनही आंध्र संघ पहिल्या डावात 211 धावांवर ऑल आऊट झाला. याच्या प्रत्युत्तरात विदर्भने दिवसाखेर एकही विकेट न गमावता 26 धावा केल्या आहेत. वसीम ऐकेकाळी मुंबई संघाकडून खेळायचा आणि यादरम्यान त्याने घरगुती क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन केले. मुंबईबरोबरच त्याने रणजी ट्रॉफीचे जेतेपद जिंकले होते. पण, मागील दोन हंगामापासून वसीम विदर्भकडून खेळत त्याने सलग दोन जेतेपदं मिळवली आहे. मागील हंगामात विदर्भकडून खेळताना जाफरने 1037 धावा केल्या. त्याने दुसऱ्यांदा रणजीत 1000 हून अधिक धावा केल्या. आणि आता देशातील या सर्वात प्रतिष्ठित देशांतर्गत स्पर्धेत जाफर पुन्हा आपल्या बॅटने शानदार प्रदर्शन करण्यास सज्ज झाला आहे.

टीम इंडियाचा सलामी फलंदाज म्हणून त्याची निवडही करण्यात आली. त्याने 31 कसोटी सामन्यात 5 शतकं आणि 11 अर्धशतकांच्या मदतीने 1944 धावा केल्या. 212 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. जाफरने कसोटी सामन्यांमध्येही 27 कॅचही पकडले आहेत.