Sambhaji Maharaj HD Images (Photo Credits: File Image)

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनी देश आणि धर्मासाठी सोसलेल्या अमानवीय यातना आणि त्यांच्या सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ पाळला जाणारा 'बलिदान मास' सध्या महाराष्ट्रात अत्यंत भावूक वातावरणात सुरू आहे. आज ९ मार्च रोजी या मासाचा ३१ वा दिवस असून, येत्या १८ मार्च २०२६ (फाल्गुन अमावास्या) रोजी या ४० दिवसांच्या स्मृती जागरची अधिकृत सांगता होणार आहे.

१८ मार्च रोजी मुख्य बलिदान दिन

यावर्षी तिथीनुसार १८ मार्च रोजी फाल्गुन अमावास्या येत आहे, जो महाराजांचा मुख्य 'बलिदान दिन' म्हणून पाळला जातो. या दिवशी पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक या ऐतिहासिक स्थळांवर लाखो शिवभक्त जमण्याची शक्यता आहे. तुळापूर येथे महाराजांची हत्या करण्यात आली होती, तर वढू बुद्रुक येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी १८ मार्च रोजी मूक पदयात्रा आणि विशेष आदरांजली सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

सामाजिक उपक्रम आणि युवा पिढीचा सहभाग

केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित न राहता, या बलिदान मासाच्या निमित्ताने गेल्या महिनाभरापासून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये रक्तदान शिबिरे, गड-किल्ल्यांची स्वच्छता आणि व्याख्यानांच्या माध्यमातून महाराजांची विद्वत्ता व शौर्य तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात आहे. 'शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान'सह अनेक संस्था या उपक्रमात सक्रिय सहभागी आहेत.

१६८९ मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले होते. स्वराज्य सोडण्यासाठी आणि धर्मपरिवर्तनासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकण्यात आला, मात्र महाराजांनी मृत्यू पत्करला पण स्वाभिमान सोडला नाही. सलग ४० दिवस त्यांना देण्यात आलेल्या यातनांचा काळ आजही शिवभक्तांच्या अंगावर शहारे आणतो. या इतिहासाची स्मृती जपण्यासाठीच हा ४० दिवसांचा काळ 'बलिदान मास' म्हणून पाळला जातो.